पुणे : बारामती आणि दौंड परिसरात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे बारामतीतील नीरा डावा कालवा फुटला. त्यामुळे प्रचंड वेगाने पाणी पालखी महामार्गावर आले आणि काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आला. तसेच बारामतीतील दीडशेहून अधिक घरात पाणी शिरलं. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून एनडीआरएफची दोन पथकं या परिसरात दाखल झाली आहेत.
पुणे जिल्ह्यात रविवारी एकूण 22.5 मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. इंदापूर आणि बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे घरात पाणी शिरले आहे. बारामतीतील साधारणपणे दीडशेहून अधिक घरात पाणी शिरल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Baramati Nira Dava Kalva : नीरा डावा कालवा फुटला
बारामतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नीरा डावा कालवा फुटला. त्यामुळे प्रचंड वेगानं पाणी पालखी महामार्गावर आलं आणि काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आला. पिंपळीत हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसला. या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचलं.
दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेला. या महामार्गावरील पाण्याच्या प्रवाहामुळे एक इनोव्हा कार वाहून गेली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. तर बारामतीतील पेन्सिल चौकाजवळील दोन धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं.
Baramati Rain Update : अजित पवार बारामती दौरा करणार
दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बारामतीचा दौरा करणार आहेत. स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तर पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर या भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. प्रशासनाला सतर्क राहण्याचे त्यांनी निर्देश दिले. तसेच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
Pune Rain Update : सुप्रिया सुळेंचे आवाहन
बारामतीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या म्हणाल्या की, बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. काही ठिकाणी रस्त्यांवर देखील पाणी आलं आहे. नागरीकांना आवाहन आहे की कृपया पुढचे काही दिवस आपण काळजी घ्यावी, गरज असेल तरच घराबाहेर पडावे. याखेरीज जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए आणि महापालिका आयुक्त यांनाही विनंती आहे की सततच्या जोरदार पावसाची नोंद घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय कराव्यात. यासह जेथे पावसाने नुकसान झाले आहे तेथे मदत पोहोचविण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी.
ही बातमी वाचा:
