पुणे : नमो रोजगार मेळाव्यात शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेदेखील मंचावर आहेत. त्यामुळे आमचं सरकार लोकाभिमुख आहे. सर्वसामान्यांचं आहे आणि राजकारण विरहीत असल्याचं आणि त्याची प्रचिती नमो रोजगार मेळाव्याच्या मंचावर येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा पार परत आहे. त्यावेळी संबोधित करताना ते बोलत होते. त्यासोबतच हे सरकार विकासाच्या बाबतीत आम्ही कोणतंही राजकारण आणू इच्छित नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


बारामती शहर विकासाचे मॉडेल


बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे. शहराच्या विकासात शरद पवार, अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. विकासकामे करताना सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांच्या दर्जात कुठेही तडजोड झाली नाही हे दिसून येते.


1 लाख 60 हजार रोजगार दिले



राज्यात यापूर्वी नोकरभरती बंद होती. या शासनाने 75 हजार रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्या तुलनेत 1 लाख 60 हजार रोजगार दिले आहेत. विविध नोकर भरती सुरू असून 22 हजार पोलिसांची भरती, 30 हजारावर शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत. त्यात मराठा समाजाला आरक्षण दिलेलेही समाविष्ट आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


शासन आपल्या दारी मध्ये 2 कोटी 60 लोकांना लाभ


शासन आपल्या दारी हा देखील राज्य शासनाचा लोकाभिमुख उपक्रम असून विविध योजना, शासन निर्णय असताना तसेच लाभार्थी असतानाही शासकीय कार्यालयात जाण्याची कटकट नको म्हणून लाभ सोडून देणाऱ्या नागरिकांना लाभ देण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. यात एकच छताखाली गरिबांना घरांचा, महिला बचत गट, शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, हार्वेस्टर आदी अनेक लाभ दिले. या कार्यक्रमातून 2 कोटी ६० लाख लोकांना विविध लाभ देण्यात आले.


प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमात राज्याचे पूर्ण योगदान


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला थेट नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रमांतर्गत जवळपास 10 लाख युवकांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्य शासनही यात कुठेही कमी पडणार नाही. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत  1 कोटी 40 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन शिक्षण धोरणामधील अभ्यासक्रमातही  कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून रोजगार देणारे हात निर्माण करण्याचाही शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात दाओस येथे जवळपास 5 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून यातून 4 ते 5 लाख रोजगार निर्माण होणार आहेत.


बारामती-विकासाचे मॉडलपोलीस हा कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असताना सणवार, उत्सव, आंदोलने आदी कालावधीत ऊन, पाऊस वाऱ्यामध्ये रस्त्यावर उभा असतो. म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना त्यांना दर्जेदार सुविधाही दिल्या पाहिजेत. त्या बारामतीतील या पोलीस वसाहतीत दिल्या आहेत.  राज्यातील सर्व बसस्थानके सर्व सोई सुविधायुक्त अशी सुसज्ज 'बसपोर्ट' करून प्रवाशांना सर्व सोई सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून बारामतीमध्ये राज्यातील पहिले मॉडेल बसस्थानक झाले आहे.


इतर महत्वाची बातमी-


Baramati Eknath Shinde : 'आमचं सरकार राजकारण विरहित'; सुप्रिया सुळे, शरद पवार मंचावर असतांना मुख्यमंत्री थेटच बोलले