पुणे : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात गॅंगवाराचा भडका उडाला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला टोळीने खून करूनच  घेतला आहे. आंदेकर खुनातील आरोपीच्या मुलावर टोळीने पिस्तुलातून ११ गोळ्या झाडल्या. त्यातील ३ गोळ्या लागून तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास नाना पेठेत घडली आहे. घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर (वय १८, रा. लक्ष्मी काॅम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, (सर्व रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आयुष कोमकर याची आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. लक्ष्मी काॅम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा बदला या खुनाद्वारे घेण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीत आला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी आरोपी अमन खान, यश पाटील हे सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते. आरोपींनी आयुष याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून केला. आयुष याच्या खुनाचा कट बंडुअण्णा आंदेकर, तसेच अन्य आरोपींनी रचला. त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी खान आणि पाटील यांनी मदत केली, असे आयुष कोमकर याची आई कल्याणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

म्हणून वनराज आंदेकरचा केला होता खून

कौटुंबिक वाद, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून १ सप्टेंबर २०२५ रोजी टोळीने नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून,  कोयत्याने वार करुन वनराज आंदेकर याचा खून केला होता. आंदेकरची बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी वाद झाले होते. कौटुंबिक वादातून खून झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषआरोपात नमूद केले होते. वनराज आंदेकर याच्या सांगण्यावरून दुकानावर महापालिका अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला. त्यानंतर आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाड याची मदत त्यांनी घेतली . दरम्यान, गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने नाना पेठेत खून केला होता. आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाड आणि साथीदारांनी आंदेकरांचा खुनाचा कट रचल्याचे तपासात उघड झाले होते.