Parth Pawar Land: महाराष्ट्राच्या राजकारणात एका जमिनीच्या खरेदी व्यवहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेलीजमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सरकारी नियमांना पायदळी तुडवत जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यामुळे महसूल विभागाकडून विशेष सवलत देण्यात आलीय का असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. याप्रकरणी पार्थ पवारांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
Parth Pawar on Land: पार्थ पवार यांची पहिली प्रतिक्रिया
पार्थ पवार यांच्यावर जमिनीचा घोटाळा केल्याचा आरोप प्रकरणात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा एबीपी माझाने प्रयत्न केला. पार्थ पवार यांच्याकडून आपण कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची फोनवरून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांच्याकडून नकार देण्यात आला आहे.
Ambadas Danve On Parth Pawar Land: दोन दिवसांत सगळं कसं काम होतं- अंबादास दानवे
पार्थ पवारांकडून १८०० कोटींच्या जागेची ३०० कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या प्रकरणी दानवेंनी संताप व्यक्त केला आहे. तर स्टॅम्पड्युटी म्हणून केवळ ५०० रुपये भरल्याचेही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या हा अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, अशीही टीका अंबादास दानवे यांनी एक्स पोस्टमधून केली आहे. त्यामुळे आता जमिनीच्या व्यवहारावरुन राज्यातील राजकीय वातावरणा चांगलेच तापण्याची शक्यता आहे. लोकांच्या अनेक वर्षे फाईल पुढे जात नाही, यांचा दोन दिवसांत सगळं कसं काम होतं, असा सवाल देखील अंबादास दानवेंनी उपस्थित केला आहे.
Ambadas Danve On Parth Pawar Land: लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते
"मेवाभाऊंच्या राज्यात...१८०० कोटींची जमीन ३०० कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये! उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. गंमत तर पुढे आहे. एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल," अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
Ambadas Danve On Parth Pawar Land: दोन दिवसात स्टॅम्प ड्युटीही माफ
"दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००!फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!," असंही अंबादास दानवे म्हणाले.
Ambadas Danve On Parth Pawar Land: तुम्हाला का जमीन फुकट लागते?
अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, राज्यात काय परिस्थिती आहे?, देवभाऊ म्हणावं की त्यांना मेवाभाऊ म्हणावे? मुरलीधर मोहळ जैन बोर्डिंगची जमीन घेतायत. अजित पवार यांचे चिरंजीव दोन दिवसात जमीन घेतात. अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत घेतात आणि त्याला स्टॅम्प ड्यूटी पन्नास रुपये लागते. अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं. तुम्हाला का जमीन फुकट लागते? अशी जमीन घेताच येत नाही, तुमच्यासाठी नियम गुंडाळून ठेवले, भू-संपादन झालेली जमीन परत कशी मिळते. महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला कशी मिळते. कोणता नियम पार्थ पवार यांनी पाळला, सर्व खुलासा पार्थ पवार यांनी करावा. पार्थ पवार अर्थमंत्री यांचे पुत्र असतील. जिथे भू संपादन झालं, काही काम झालं नाही, ती जमीन सर्वांना द्या. अशी आमची मागणी करतो, सरकारने निर्णय घ्यावेत. दहा महिने मंत्रालयातील फाईल पुढे सरकत नाही दोन दिवसात पार्थ पवारांची फाइल कशी सरकली. राज्याला लुटण्याचा प्रकार सुरू आहे. अजित पवार यांचा राजकीय वापर केला असेल, ते नकाणे कांदे सोलतात त्यांनी याचे उत्तर द्यावं, असा हल्लाबोल दानवेंनी केला आहे.