मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषद (ZP election) आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ खुललं आहे. भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सर्वाधिक जागा जिंकत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मात्र, कायमच ग्रामीण महाराष्ट्रातील त्यातचही पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वरचष्मा राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही कमालीचं कमबॅक केलं आहे. राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक जागा जिंकत दिवंगत अजित पवारांची ग्रामीण भागातील पकड पुन्हा एकदा सिद्ध केली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत ही निवडणूक लढवण्यात आली. त्यामध्ये, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठं यश राष्ट्रवादीला (NCP) मिळालं आहे. राष्ट्रवादीच्या या विजयानंतर प्रतिक्रिया देताना नेतेमंडळी अजित पवारांची आठवण काढत भावुक होत आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. 

Continues below advertisement

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक जागा जिंकल्या असून आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या 172 जागा जिंकल्या असून पुणे जिल्ह्यात जवळपास 44 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोसह जल्लोष केला. तर, काहींचा दादांच्या आठवणीने कंठ दाटल्याचंही पाहायला मिळालं. पुणे जिल्हा परिषदेच्या 74 जागांसाठी ही निवडणूक होत असून येथे राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 40 पेक्षा जागा जिंकत पक्षाचं वर्चस्व सिद्ध केलंय. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसला करावा लागला होता. त्यामुळे, जिल्हा परिषद निवडणुकीत येथील जनता राष्ट्रवादीला किती स्वीकारेल हाही प्रश्न होता. मात्र, राष्ट्रवादीचं कमबॅक राष्ट्रवादीच अस्तित्व सिद्ध करणारं आहे. मात्र, राष्ट्रवादीचं हे यश पाहायला पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार नाहीत याचं दु:ख सर्वांनाच आहे. या निकालावर सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया देत हा निकाल अजित दादांच्या विचारांवरील अढळ श्रद्धा असल्याचं त्यांनी म्हटलं.    

''आज जाहीर झालेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, आमचे नेते मा.श्री. अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर तळागाळातील माणसासाठी झटत विकासाला गती दिली. आजचा हा निकाल म्हणजे त्यांच्या विचारांवरील, त्यांच्या नेतृत्वावरील अढळ श्रद्धेची साक्ष आहे. या माध्यमातून दादांचा वारसा जपत अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे,'' अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'