Rohit Pawar: अजितदादांची विमान दुर्घटना कट होता का? रोहित पवारांचा गंभीर संशय, डिस्ट्रेस कॉल नाही, ट्रान्सपाँडर बंद? दिल्लीत जाऊन काय-काय बोलले?
Rohit Pawar: बारामती विमान दुर्घटनेवर रोहित पवारांचे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पायलट बदलापासून ट्रान्सपोंडर बंद होण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी शंका उपस्थित केली असून पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.

मुंबई : बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सुरू असलेल्या चौकशीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या घटनेबाबत काही बाबी संशय निर्माण करणाऱ्या असल्याचे सांगत सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली.(Baramati Plane Crash)
रोहित पवार यांनी सांगितले की दुर्घटनाग्रस्त विमान सुमारे १६ वर्षे जुने होते. अपघाताच्या वेळी पायलटने कथितरीत्या उच्चारलेले शब्दही त्यांनी नमूद केले. “को-पायलट पाठक यांच्यावर आम्हाला संशय नाही; मात्र कॅप्टन कपूर यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होतात,” असे ते म्हणाले. २०२३ मध्ये मुंबईत अशाच प्रकारचा विमान अपघात झाला होता आणि त्याची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.(Baramati Plane Crash)
रोहित पवार यांच्या मते, सुरुवातीला वेगळे दोन पायलट ही उड्डाण पार पाडणार होते; मात्र ऐनवेळी दोघांनाही बदलण्यात आले. हा निर्णय का घेण्यात आला, याचे स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एका फाइलवर स्वाक्षरी करण्यासाठी अजित पवार यांना थोडा उशीर झाला होता, असेही त्यांनी नमूद केले. “दादा विमानप्रवासात कधीही धोका पत्करत नसत. ते नेहमी कॅप्टनच्या सूचनांचे पालन करत,” असे रोहित पवार म्हणाले. संबंधित कंपनीकडून उड्डाणाला परवानगी देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच, दुर्घटनेची चौकशी अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची टीका त्यांनी केली.(Baramati Plane Crash)
कॅप्टन कपूर यांच्या पार्श्वभूमीवर प्रश्न
कॅप्टन कपूर यांच्या पूर्वीच्या नोंदींबाबत शंका उपस्थित करत रोहित पवार यांनी सांगितले की, त्यांच्यावर यापूर्वी शिस्तभंग आणि मद्यप्राशनासंबंधी वाद झाले होते. अशा परिस्थितीत व्हीआयपी उड्डाणासाठी त्यांची नियुक्ती का करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी विचारला.पायलट बदलण्यामागे ‘वाहतूक कोंडी’चे कारण दिले गेले. मात्र, इतक्या पहाटे मुंबईत ट्रॅफिक जाम असणे शक्य नाही, असे म्हणत त्यांनी या कारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रोहित पवार यांनी काही तांत्रिक मुद्द्यांवरही स्पष्टीकरण मागितले
* अपघातापूर्वीच्या शेवटच्या एका मिनिटात नेमके काय घडले?
* विमानाचा ट्रान्सपोंडर का बंद होता?
* रनवे ११ वर उतरवण्याचा प्रयत्न का झाला? रनवे २९ निवडला असता दुर्घटना टळली असती का?
* डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ५००० मीटर दृश्यमानता आवश्यक असताना ३००० मीटरवर लँडिंग का करण्यात आली?
या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत उत्तरे मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशीची मागणी
“या घटनेबाबत कोणाच्याही मनात शंका राहू नये. त्यामुळे स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी होणे अत्यावश्यक आहे,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. सत्य बाहेर येणे हीच दिवंगत नेत्याला खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
शेवटच्या क्षणी पायलट बदल का?
दुर्घटनेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही पायलटांची शेवटच्या क्षणी झालेली अदलाबदल, असे रोहित पवार यांनी म्हटले. मूळ नियुक्त पायलटांना हटवून दुसऱ्या पायलटांची नेमणूक का करण्यात आली, याबाबत स्पष्टता हवी आहे. तसेच, बदललेल्या पायलटांपैकी एक जण हाँगकाँगहून नुकताच परतला होता, ही बाबही संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
उड्डाणापूर्वी अनिवार्य असलेली वैद्यकीय तपासणी आणि अल्कोहोल चाचणी योग्य प्रकारे करण्यात आली होती का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “मुख्य पायलट शेवटच्या क्षणी का बदलला? हा निर्णय नेमका कुणी आणि का घेतला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पायलटची पार्श्वभूमी आणि तांत्रिक त्रुटींची शंका
रोहित पवार यांनी संबंधित पायलटच्या पूर्वीच्या नोंदींचाही उल्लेख केला. अल्कोहोल चाचणीत अपयश आणि प्रशिक्षण सत्रे चुकवण्याच्या घटना पूर्वी घडल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे कंपनीतील अंतर्गत संवाद आणि पायलटच्या फिटनेसबाबतची कागदपत्रे तपासावीत, अशी मागणी त्यांनी केली.दुर्घटनेदरम्यान कोणताही ‘डिस्ट्रेस कॉल’ करण्यात आला नाही, तसेच विमानाचा ट्रान्सपोंडर कार्यरत नव्हता, ही बाबही गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. विमानाची नियमित देखभाल झाली होती का, त्याच्या उड्डाणक्षमतेला प्रमाणपत्र कोणी दिले, तसेच देखभाल नोंदी सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
ऑपरेटरचा रेकॉर्ड आणि SOP उल्लंघनाचा मुद्दा
विमानाचे वय, ऑपरेटरचा पूर्वीचा सुरक्षा रेकॉर्ड आणि मानक कार्यपद्धतींचे पालन झाले होते का, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. पायलटचे ड्युटी तास, इंधन व्यवस्थापन, देखभाल पद्धती आणि सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता यांची सखोल चौकशी व्हावी, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी संबंधित ऑपरेटरकडून घडलेल्या घटनांचे अहवाल सार्वजनिक का करण्यात आले नाहीत, हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आंतरराष्ट्रीय संस्थांकडून चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, वेळबद्ध आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करत रोहित पवार यांनी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संस्थांचा सहभाग घ्यावा, असे सुचवले. केवळ पारदर्शक तपासच सर्व शंका दूर करू शकतो आणि कोणत्याही गैरप्रकाराची शक्यता नाकारू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
२०२३ मध्ये हा अपघात कसा झाला
रोहित पवार यांनी दिल्लीत प्रेझेंटेशन दाखवत पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना त्यांनी अनेक बाबींवर भाष्य केलं, यावेळी ते म्हणाले की, "आजही, आमचे मुख्यमंत्री असोत, आमचे मंत्री असोत, आमचे नेते असोत किंवा काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर दिल्लीला आले होते. त्यांनी तिथेही व्हीएसआर विमान वापरले होते. व्हीएसआर ज्या पद्धतीने विमानाची देखभाल करते ते चुकीचे आहे. परिणामी, २०२३ मध्ये मुंबईत अपघात झाला आणि आता अजितदादांचा अपघात झाला. म्हणून, आम्ही सर्वांना विनंती करतो की कृपया कोणत्याही व्हीएसआर विमानाचा वापर करू नका, मग ते कितीही मोठे असले तरी... अलीकडेच, युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने, व्हीएसआरच्या ऑपरेटरला मेसेज पाठवला की २०२३ मध्ये हा अपघात कसा झाला. पण तिथे कोणतीही माहिती देण्यात आली नाही, अगदी डीजीसीए द्वारेही नाही, म्हणून, माहिती येत नसल्याने, त्यांनी तिसऱ्या देशाच्या ऑपरेटरसाठी व्हीएसआरची अधिकृतता रद्द केली. ईएएसएने कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला... विमान वाहतूक क्षेत्र हाताळणाऱ्या काही अतिशय वरिष्ठ पत्रकारांनी मला सांगितले की काही दिवसांपूर्वी डीजीसीए द्वारे युरोपियन एजन्सीला अहवाल देण्यात येणार होता, परंतु एका व्यक्तीने जाणूनबुजून तो थांबवला. ती व्यक्ती कोण आहे? आपल्याला नंतर कळेल, पण ती व्यक्ती आहे.. विमानचालनाचा अनुभव असलेला एक राजकीय व्यक्ती आहे...", अशी माहिती रोहित पवारांनी दिली.
संबंधित कंपनी हा नियम पाळत नसल्याची माहिती समोर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी उड्डाण सुरक्षेबाबत अनेक त्रुटी असल्याचा दावा केला.रोहित पवार म्हणाले की, पायलटच्या ड्युटीनंतर किमान १२ तासांचा विश्रांतीचा कालावधी आवश्यक असतो; मात्र संबंधित कंपनी हा नियम पाळत नसल्याची माहिती समोर आली आहे. काही विमानांमध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर बंद ठेवला जातो, असेही त्यांनी म्हटले. दुर्घटनाग्रस्त विमानाचा संपूर्ण डेटा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.तसेच, उड्डाणापूर्वी आवश्यक असलेली चेकलिस्ट आणि टेकलॉग योग्य प्रकारे मेंटेन केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. “विमान उड्डाण करण्यापूर्वी त्याची तांत्रिक तपासणी होणे बंधनकारक असते; मात्र येथे ती करण्यात आली नाही,” असे ते म्हणाले.विमानाला ठरावीक आयुष्यचक्र (लाइफ सायकल) असते. त्यानंतर इंजिन आणि इतर महत्त्वाची उपकरणे बदलणे आवश्यक असते. मात्र कंपनीने या बाबींची पूर्तता केली नाही किंवा प्रत्यक्ष उड्डाण तासांबाबत चुकीची नोंद दाखवली, असा दावा त्यांनी केला. “५० तास उड्डाण केल्याचे दाखवले जात असताना प्रत्यक्षात १०० तास उड्डाण झाले होते,” असा आरोपही त्यांनी केला.याशिवाय, डीजीसीएतील काही अधिकारी आणि संबंधित कंपनीच्या मालकांमध्ये जवळीक असल्याचा आरोप करत, या संबंधांचा परवानग्या आणि परवाना प्रक्रियेवर परिणाम झाला का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
























