Vasai-Virar Municipal Corporation Election 2026: वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेनं भाजपला (BJP) मोठा धक्का दिला आहे. यात भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष सचिन राऊत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला आहे. शिवसेना नेते विलास पोतनीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला अधिक बळ मिळाले असून या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Vasai-Virar Election 2026: प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र, अद्यापही राजकीय पक्षांकडून जागावाटपावरच अंतिम शिक्कामोर्तब झालेला नाही. दुसरीकडे मुंबईत(Mumbai) ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा झाली, मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटेना झालाय. तर मुंबई महापालिकेसाठी (BMC election) भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यातील महायुतीचे (Mahayuti) जागा वाटप अंतिम टप्प्यात असून 207 जागांवर एकमत झालं असल्याची माहिती आहे. 20 जागांवरील चर्चा सुरू असून लवकरच पहिली यादी जाहीर होणार आहे.
असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरभाजपातून थेट ठाकरे गटात झालेल्या या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सचिन राऊत यांना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, या प्रवेशामुळे वसईतील ठाकरे गटाची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या घडामोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वसई-विरारमध्ये महायुतीतून शिवसेना ठाकरे गट बाहेर-
वसई–विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आज आपल्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उबाठा गटाने ‘ऐकला चलो’ची भूमिका स्वीकारल्याचे स्पष्ट झाले असून, वसई–विरारमध्ये महायुती तुटल्याची चिन्हे ठळकपणे दिसू लागली आहेत. आज जवळपास १०० जणांना एबी फॉर्म वाटपक केलं जाणार असल्याच कळतं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू होती. मात्र सध्याच्या घडामोडींमुळे ही चर्चा आता धूसर झाल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, वसई–विरारमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली असून, दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. एकूणच वसई–विरारच्या राजकारणात शिवसेना उबाठा गटाने वेगळी भूमिका घेतल्याने आता नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून, निवडणूक लढतीत तिरंगी-चौथ्या आघाड्यांची शक्यता अधिक गडद होताना दिसत आहे.