Uddhav Thackeray : अजित पवार बेधडकपणे सांगतायत, शेतकऱ्यांनो हातपाय हलवा, मग सरकार म्हणून तुम्ही काय हलवताय? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray : तुम्ही शेतकऱ्यांना हातपाय हलवायला लावताय, मग सरकार म्हणून तुम्ही काय हलवताय? असा मिश्किल सवाल करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तोफ डागली आहे.

Uddhav Thackeray : पंचांग पाहून मुहूर्तवर मुहूर्त निघून गेलेत, मात्र अद्याप सरकारला मुहूर्त सापडत नाहीये. अजित पवार (Ajit Pawar) तर बेधडकपणे सांगतायत कि 'आम्हाला निवडणूक जिंकायची होती म्हणून आम्ही कर्जमाफीची (Farmers loan waiver) घोषणा केली. मात्र आम्हालाही अडचणी आहेत. पण तुम्ही जरा हातपाय हलवा', असं उपमुख्यमंत्री सांगताय, कोणाला सांगताय तुम्ही? देशाच्या अन्नदात्याला? आता आपत्ती अशी आलीय कि हातपाय हलवणाऱ्या शेतकऱ्याला तोच हात कपाळावर मारून घ्यायची वेळ आली आहे. त्यात तुम्ही शेतकऱ्यांना हातपाय हलवायला लावताय, मग सरकार म्हणून तुम्ही काय हलवताय? असा मिश्किल सवाल करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तोफ डागली आहे. तसेच मराठवाड्यातील अतिवृष्टीने (Marathwada Heavy Rain) बाधित शेतकऱ्यांच्या मुद्दयांवरून सरकारवर सडकून टीका केलीय.
Uddhav Thackeray on Loan Waiver : शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्ती करा आणि हेक्टरी 50 हजार रुपये द्या
मराठवाड्यातील (Marathwada) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) पाहणी दौरा सुरू केला आहे. 'आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिहारमधे सांगताहेत की सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे', असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, पीक विम्यापोटी 2, 3 रुपये देऊन थट्टा केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सरकारने जूनपर्यंत कर्जमाफीचा दिलेला वायदा आम्हाला मान्य नाही, शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्ती (Loan Waiver) करा आणि हेक्टरी 50 हजार रुपये द्या, अशी मागणी ठाकरेंनी केली आहे. ही मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन (Protest) करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
Uddhav Thackeray : ...तर तुमच्या ऐकीने या सरकारला पाझर फुटणार नाही का?
मी आज मत मागायला आलेलो नाही, तर तुमच्या लढ्यासाठी मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर आलोय. तुमच्यामुळे मातीत बी पेरून अंकुर फुटतं, तर तुमच्या ऐकीने या सरकारला पाझर फुटणार नाही का? तुम्ही आता शेतकरी म्हणून एक व्हा, असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे आजपासून सलग चार दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं, मात्र ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का?, सरकारने दिलेल्या पॅकेजचे काय झालं?, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली किती रक्कम पोहोचली?, शेतकऱ्यांच्या हातात महिनाभरानंतर किती पैसे आले? याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत. अशातच या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
Uddhav Thackeray on Maharashtra Government: शेतकऱ्याची थट्टा सरकारने लावली आहे
दरम्यान, सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हि शेतकऱ्याची थट्ट आहे, पीक विम्याचे किती लोकांना पैसे मिळाले. मुळात पीकविम्याची किती रक्कम मिळणं अपेक्षित होती आणि मिळाली किती हा मोठा प्रश्न आहे. पालघर, ठाणे जिल्ह्यात दोन- तीन रुपये रक्कम मिळाली, हि शेतकऱ्याची थट्टा सरकारने लावली आहे. आता मुख्यमंत्री सांगताय, आता कर्जमाफी केली तर बँकेचा फायदा होईल. हे अजब लॉजिक मला काही कळलं नाही. शेतकरी कर्जमाफी आधी खरडून गेलेली माती मागतोय. मात्र मी तुमच्या सर्व शेतकऱ्यांसोबत कायम आहे. असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला.



















