Sunil Tatkare on NCP Merger: गेल्या काही दिवसांपासून जवळपास संपल्यात जमा झालेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजितदादा गटाचे  आमदार सुनील शेळके यांनी याबाबत भाष्य केले आहे. दोन्ही पक्ष एकत्रित येणार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, असे वक्तव्य सुनील शेळके यांनी केले. सुनील शेळके यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगेचच 'एबीपी माझा'शी संवाद साधत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली.

Continues below advertisement

आमदार सुनील शेळके पुणे जिल्ह्यातील प्रभावी नेते आणि तरुण आमदार आहेत.  अजितदादांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीने काम केले आहे. मोठ्या फरकाने ते मावळ मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी जी भावना व्यक्त केली ती व्यक्तिगत होती की त्यांच्याकडे यासंदर्भातील माहिती होती, मला कल्पना नाही. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्त्वात पुढील काळात पक्षाचं काम सुरु राहावं, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. मनावर प्रचंड मोठा आघात होऊनही ज्या पद्धतीने वहिनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संयमाने आणि सोशिकतेने कारभार करत आहेत. ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. सुनील शेळके यांनी विलिनीकरणाबाबत जे काही म्हटलं आहे, त्याबाबत चर्चा सुरु आहे का, मला माहिती नाही. पण तशी चर्चा सुरु असेल, त्याबाबतचा अंतिम निर्णय वहिनीच घेतील, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

Maharashtr Politics: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत म्हणून भाजपचा दबाव आहे का? सुनील तटकरे म्हणाले...

Continues below advertisement

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण भाजपच्या दबावामुळे अडले आहे का, या प्रश्नाचे उत्तरही सुनील तटकरे यांनी दिले. त्यांनी म्हटले की, भाजपकडून कधी विलीनीकरणाबाबत दबाव राहिलेला नाही. ज्यावेळी आम्ही अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यानंतरच्या घडामोडी सर्वांनी पाहिल्या आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच बाबतीत कधीही हस्तक्षेप केलेला नाही. भाजपच्या केंद्र आणि राज्य नेतृत्त्वाने आम्हाला नेहमीच मित्रपक्ष म्हणून सन्मानाची वागणूक दिली आहे. त्यामुळे भाजपचा दबाव असण्याचा प्रश्न नाही. प्रश्नांतर्गत आमचा विलीनीकरणाबाबत आमचं म्हणणं असण्याचं कारण नाही, यासंदर्भातील निर्णय वहिनीच घेतील. या क्षणाला माझ्याकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. पण ज्येष्ठ आमदार सुनील अण्णा कोणत्याही संदर्भात हे वक्तव्य केले आहे, हे मला माहिती नाही. त्यामुळे मला या विषयावर मत व्यक्त करायचं नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हा निर्णय त्यांच्याच संमतीने घेतला. त्यानंतर विलीनीकरणाच्या विषयावर पडदा पडला, त्यावर पुन्हा कधी चर्चा झालीच नाही. मी दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. मी अजितदादांसोबत महाराष्ट्रभर फिरलो आहे. पण विलीनीकरण हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. या सगळ्या जर-तरच्या गोष्टी असल्याने आज मला याबाबत काही बोलायचं नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

"अजूनही वेळ गेलेली नाही, दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर अभिमान.., सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य करा"; सुनील शेळकेंचं मोठे विधान