रायगड : जिल्ह्यातील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा वाद हत्याकांडापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, खोपोलीतील (Raigad) शिवसेना महिला नगरसेवकाच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे दिवंगत मंगेश काळोखे यांच्या परिवाराची खोपोलात जाऊन भेट घेतली. तत्पूर्वी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्याप्रकरणी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे (Sunil tatkare) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनिल तटकरे यांनी रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरू केले आहे. विरोधकांच्या हत्या यांच्या सांगण्यावरून केल्या जात आहेत, सुनिल तटकरे हेच रायगडचा आका आहेत, अशा शब्दात शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीतील हत्याकांडावरुन सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी केली. त्यावर आपण काळोखे कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभे असून कुणालाही सोडणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबीयांना दिला. नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर काहीच दिवसात मंगेश काळोखे यांची भरचौकात निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि त्यांच्या गुंडांनी ही हत्या केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. एकनाथ शिंदेंना भेटताच काळोखे कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. आरोपींवर मोका लावा, त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी यावेळी केली. तर, या हत्याकांडाचा प्लॅन सुनील तटकरे यांच्याच भेटीत शिजल्याचं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे.
सुतारवाडीत तटकरेंच्या भेटीत प्लॅन शिजला
आरोपी रविंद्र देवकर याने चार पाच दिवसाआधी सुतारवाडी येथे जाऊन सुनिल तटकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत मंगेश काळोखे यांची हत्या करण्याचा प्लॅन करण्यात आल्याचा गंभीर आणि खळबळजनक दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. या हत्येत सुधाकर घारे यांचा सहभाग आहे, रविंद्र देवकर आणि सुधाकर घारे यांनी प्री-प्लान करून मंगेश काळोखे यांची हत्या केली आहे. जोपर्यंत सुधाकर घारेसह 10 आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत आम्ही हटणार नाही. याप्रकरणी पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करू, असेही आमदार थोरवे यांनी म्हटलं.
