Sunetra Pawar on Maharashtra Rains : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Maharashtra Rains) अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेती, जनावरं आणि घरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झाल्याची परिस्थिती आहे. तर सोलापूर आणि लातूरमध्ये देखील पावसाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय.   

Continues below advertisement

खासदार सुनेत्रा पवार यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे की, माझ्या लातूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनो व पदाधिकाऱ्यांनो... ही अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, आपल्यातील माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात आहे. आज आपल्या भागात पावसाने थैमान घातले आहे. या संकटात आपल्या बळीराजाच्या डोळ्यादेखत त्याची मुकी जनावरं वाहून जात आहेत, ही बातमी ऐकून मन सुन्न झालं आहे. शेतकऱ्यासाठी त्याचं जनावर हे केवळ एक प्राणी नसतो, तर त्याच्या कुटुंबाचा सदस्य असतो. त्याचं हे नुकसान कधीही भरून न येणारं आहे. अशावेळी त्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसणं, हे आपलं पहिलं कर्तव्य आहे.

Continues below advertisement

आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू : सुनेत्रा पवार 

या कठीण काळात, मी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते की, चला, आपल्या गावागावात, प्रत्येक गल्ली-बोळात पोहोचूया. पाण्यात अडकलेल्या, मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपण आधार बनूया. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी, जेवणाची आणि निवाऱ्याची सोय करण्यासाठी दिवस-रात्र एक करूया..! शासन आणि प्रशासन त्यांच्या पातळीवर काम करत आहेच, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कठीण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पण ही फक्त त्यांची जबाबदारी नाही, तर एक माणूस म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून आपलीही जबाबदारी आहे. आज आपल्या माणुसकीची खरी परीक्षा आहे. चला, एकजुटीने या संकटाचा सामना करूया. पक्ष, पद, आणि विचार या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ 'माणूस' म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहूया. आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी एकत्र येऊया. मला खात्री आहे, आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

आणखी वाचा 

Wet Drought in Maharashtra: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याच्या हालचालींना वेग, कृषीमंत्री अन् मदत-पुनवर्सन मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?