Sunetra Pawar Meet Naredra Modi And Amit Shah In Delhi: देवेंद्र फडणवीसांचा काल रात्री अचानक दिल्ली दौरा, पहाटे मुंबईत पोहोचले; आज सुनेत्रा पवारही दिल्ली गाठणार, नेमकं काय काय घडतंय?
Sunetra Pawar Meet Narendra Modi And Amit Shah In Delhi: देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

Sunetra Pawar Meet Narendra Modi And Amit Shah In Delhi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (09 फेब्रुवारी) रात्री अचानक दिल्ली गाठल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची रात्री भेट घेतली. त्यानंतर आज पहाटेच देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल झाले. राज्यातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आलंय. पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचे वेध लागू लागले आहेत. विलिनीकरणाबाबत राज्यातल्या मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे.
राज्यात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौराही त्याच अनुषंगाने असल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत. आज सायंकाळी 6.45 सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना होतील.
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारही दिल्लीत जाणार- (Sunetra Pawar Delhi)
सुनेत्रा पवार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी जात असल्याची उपमुख्यमंत्री कार्यालयाची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा गुप्त दौरा केल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आलं आहे. दिल्ली दौऱ्यामधे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल देखील सोबत असणार आहेत.
जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर- (Ajit Pawar NCP ZP Election 2026)
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट दुसऱ्या स्थानी राहिला आहे. यापूर्वी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीतही विक्रमी जागा जिंकत भाजपने यशाचे शिखर गाठले होते. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. जिल्हा परिषदेत 731 जागांपैकी भाजपचे सर्वाधिक 233 सदस्य निवडून आले आहेत. त्याखालोखाल अजित पवार गट 167 आणि शिंदेसेना 162 जागा जिंकल्या आहेत. महायुतीने 731 पैकी तब्बल 562 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस 56, शरद पवार गट 26 आणि उद्धवसेना 43 अशा महाविकास आघाडीने अवघ्या 125 जागा जिंकल्या आहेत.
























