Sanjay Gaikwad : विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. डिसेंबर महिन्याच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत असून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) एकत्र लढणार की स्वबळावर निवडणूक लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचं वक्तव्य केलंय. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तीन-तीन कोटीपर्यंत खर्च होतो, असे म्हणत त्यांनी निवडणुकीचा खर्चच सांगितला आहे.
बुलढाणा येथे बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, आम्ही शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार. आम्हाला भाजप-शिवसेना युती पाहिजे आहे. ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. कारण आम्ही विधानसभेला युती करतो. लोकसभेला युती करतो आणि ज्या वेळेस छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते त्यावेळेस त्यांना आपण वाऱ्यावर सोडतो. त्यांनी पैसे खर्च करून काय मातीत जायचे आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
काही ठिकाणी शंभर बोकडं एका व्यक्तीकडून दिली जातात
संजय गायकवाड पुढे म्हणाले की, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्या आहेत का? एक-एक, दोन-दोन, तीन-तीन कोटी तर काही ठिकाणी शंभर बोकडं एका व्यक्तीकडून दिली जातात. इतक्या महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो. त्यामुळे आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की, जे धोरण चिखलीचे ठरेल, जे मलकापूरचे ठरेल ते धोरण जर बुलढाणा ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत, असे त्यांनी म्हटले.
वडेट्टीवारांचा संजय गायकवाडांवर हल्लाबोल
दरम्यान, संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतलाय. ते म्हणाले की, ज्याला जशी सवय तशी वक्तव्य. त्यांना खोके आणि बोक्यांची सवय लागलेली आहे. बोके म्हणजे बोकड... त्यांच्या पोटात होतं ते ओठात आलं. संजय गायकवाड हे सत्य बोलतात. आणि सत्य करतात. 3 कोटी रुपये आणि 100 बोकड. किती बोकडं पोसून ठेवले आणि किती कोटी जमा केले, किती कोटी वाटणार आहेत? याबाबत आम्हाला निवडणूक आयोगाला सांगावा लागेल की यांच्यावर लक्ष ठेवा. किती कोटी देतो, तीन कोटी की चार कोटी देतो. शंभर बोकडं देतो की दोनशे बोकडं देतो? यावर लक्ष ठेवण्यासाठी पत्र लिहायला लागेल, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी संजय गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केला.
आणखी वाचा