मुंबई : भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) करतात ही गोष्ट आपल्याला विसरुन चालणार नाही. जिथे देशाची प्रतिष्ठा असते तिथं राजकीय आरोप करायचे नसतात असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. पुण्यातील लक्ष्मणराव गुट्टे रूरल डेव्हल्पमेंट फाऊंडेशन आयोजित युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक केलं.
शरद पवार म्हणाले की, "नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. काही राजकीय विचारांच्या संबंधी माझी आणि त्यांची भूमिका वेगळी असू शकते. पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला विसरुन चालणार नाही. जिथे देशाची प्रतिष्ठा येते तिथे राजकीय आरोप करायचे नसतात."
मुंबईतील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला एकेकाळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व केलेले मंत्री उदय सामंत, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री जयकुमार रावल, रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार संजय पाटील, धैर्यशील माने, नरेंद्र भोडेकर, अतुल भोसले असे अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.
Mumbai NCP Youth Programme : राजकीय कारकिर्दीचा आढावा
या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवक काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकारी यांचा हा कार्यक्रम आहे. इंदिरा गांधींमुळे आम्हाला युवक दशेत पक्षात काम करण्याची प्रेरणा मिळाली. सुरुवातीला मी बारामती युवक काँग्रेसचा प्रमुख झालो. पुढे चार वर्षांनी महाराष्ट्राचा प्रमुख झालो.
यावेळी जुन्या आठवणी सांगताना शरद पवार पुढे म्हणाले की, "काँग्रेसमध्ये काम करत असताना आम्ही पंडित नेहरुंना भेटण्याची विनंती केली. पंडित नेहरुंना भेटायचे आणि त्यांच्यासमोर शेतकऱ्यांचे आणि इतर प्रश्न मांडायचं असं ठरवलं. पण पंडित नेहरु समोर आले आणि आम्ही काय बोलायचं ते विसरून गेलो."
इंदिरा गांधी यांच्याबाबत आठवण सांगताना शरद पवार म्हणाले की, "इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. रशिया दौऱ्यावर त्या गेल्या असता तिथल्या राष्ट्रपतींनी त्यांचं स्वागत केलं नाही. इंदिरा गांधी त्यावेळी तिथल्या लहान मुलांसोबत खेळायला लागल्या. ते पाहून राष्ट्रपतींना गांधींचे स्वागत केलं नसल्याची चूक लक्षात आली. इंदिरा गांधी यांच्यासोबत काम काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य."
ही बातमी वाचा:
