Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Satara Zilla Parishad Election 2026) मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील (Makarand Patil) यांना आपल्या सदस्यांना सभागृहात नेण्यासाठी पोलीस व प्रशासनाशी झुंज द्यावी लागली. या धक्काबुकीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील यांना 20-25 पोलिसांनी घेरल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या अभूतपूर्व गोंधळाची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. मात्र, मंत्री जयकुमार गोरे यांनी या निलंबनाच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला. तर या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील राड्याबाबत विधानसभेत सविस्तर माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.
Eknath Shinde: काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील घटनेसंदर्भात माहिती शंभुराज देसाई आणि अर्जुन खोतकर यांनी मांडली. याचा मी साक्षीदार आहे. तिथे पाच ते दहा वर्षांपूर्वीचा गुन्हा दाखल केला. मी पोलीस अधीक्षकांना फोन केला की, त्यांना मतदानाच्या नंतर कारवाई करा. मतदानापासून वंचित ठेवता येत नाही. ते म्हणाले लगेच कारवाई करत नाही. मी पोलिस महासंचालकांना देखील फोन केला. मी तुषार दोषी यांच्याकडून खात्री केली होती. ते म्हणाले, मला फोन आला होता. मतदानापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीचा खून करणे आहे. मंत्र्यांना देखील बघितले नाही. आरोपी प्रमाणे मंत्र्यांना घेऊन गेले.दोनच जणांना मतदानाला ते कसे घेऊन गेले? महाराष्टाराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली, असे त्यांनी म्हटले.
Devendra Fadnavis: काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, त्याची चौकशी केली जाईल. त्यानुसार कारवाई केली जाईल, असे म्हणत त्यांनी एका वाक्यात विषय संपवला. दरम्यान, सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभुराज देसाई यांच्यात चर्चा देकील झाली. यावेळी मुख्यमंत्री चिडल्याचे समजते. यावेळी मागील बाकावर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटीलही उपस्थित होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्याने मुख्यमंत्री संतप्त झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री सभागृहातून बाहेर गेल्यानंतर लगेचच जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील बाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.
Satara ZP Election: साताऱ्यात काय झालं?
१ जि.परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे ६५ पैकी ३५ जागा मिळवत बहुमत
२ भाजप २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर
३ साताऱ्यात बहुमतासाठी ३३ सदस्यांच्या पाठिंब्याची होती गरज
४ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने ६ सदस्य फोडत अध्यक्ष बनवला
५ भाजपने शिवसेनेचे २,राष्ट्रवादीचे ३ सदस्य फोडले
६ भाजपने एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली
७ इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा शिवसेनेचा आरोप
आणखी वाचा
