Sanjay Shirsat on Mahayuti: आगामी निवडणूक महायुतीतच लढवायची, पण काही जण आमच्याशी छळ कपट करतात; संजय शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, नेमका रोख कुणाकडे?
Sanjay Shirsat on Mahayuti: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महायुतीबाबत मोठं वक्तव्य केलंय

Sanjay Shirsat on Mahayuti: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (local body Elections) आणि महायुतीबाबत (Mahayuti) भुवया उंचावणारे वक्तव्य केले आहे. "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत. मात्र काही जण आमच्याशी छळ कपट करत आहेत. जे लोक आमचा छळकपट करत आहेत, त्यांना रोखलं पाहिजे. ज्यांना वाटतं युती होऊ नये त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे," असे वक्तव्य त्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
Sanjay Shirsat on Mahayuti: नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा गटप्रमुख मेळावा शुक्रवारी पार पडला. या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्हाला महायुतीमध्ये लढायचे आहे. महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. हा तुमचा आदेश आहे तो आम्हाला मान्य आहे. परंतु, काही लोक आमचा छळ कपट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आपल्याला रोखले पाहिजे. मी इतरांबद्दल बोलत नाही. मी महायुतीबद्दल बोलत नाही तर आपल्यामधले काही लोक ज्यांना असे वाटत आहे की, युती होऊच नये त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले. संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Sanjay Shirsat on Mahayuti: संबंधितांची तक्रार वरिष्ठांकडे करणार
याबाबत संजय शिरसाट यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता ते म्हणाले की, महायुतीमध्ये सर्व निवडणुका लढत असताना काही लोकांची मानसिकता अशी असते की, आपल्याला युती करायची नाही किंवा युती न करता आपला स्वतःचा स्वार्थ साधायचा. त्यांच्यासाठी दिलेला हा इशारा होता. शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की, आपल्याला महायुती म्हणूनच लढायचे आहे. त्यामुळे आता इतरांनी काही कॉमेंट्स करणे योग्य नाही. वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात. खालच्या पातळीवरचे नेते जे स्टेटमेंट देतात, ते योग्य नाही म्हणून त्यांना सज्जन द्यायचा, असा हेतू होता, असे त्यांनी म्हटले. तुमचा नेमका कुणाकडे रोख आहे? याबाबत विचारले असता संजय शिरसाठ म्हणाले की, नाव घेऊन वादाला तोंड फोडणे हे आताच्या घडीला योग्य होणार नाही. परंतु संबंधितांची तक्रार निश्चितच वरिष्ठांकडे केली जाईल, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा


















