Sanjay Raut on K Annamalai: एकीकडे मुंबई मराठी माणसाची की आणखी कुणाची? या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच, या वादात आता तामिळनाडूतून मुंबईत प्रचारासाठी आलेल्या भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई (K Annamalai) यांनी मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करत, हे शहर महाराष्ट्राचे नाही अशा आशयाचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत अण्णामलाई यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, “मुंबईत रसमलाई आली होती… म्हणे मुंबई आणि महाराष्ट्राचा काय संबंध? अरे भXX, तुझा काय संबंध आहे इथे यायचा?" अशा शब्दांत त्यांनी अण्णामलाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अण्णामलाई यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. 

Continues below advertisement

Sanjay Raut on K Annamalai: नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सोमवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना के. अण्णामलाई यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, अण्णामलाई कोण आहे? साX भXX... भाजपने आमच्यावर फेकलेले हे मुंगळे आहेत, असा खरपूस समाचार त्यांनी घेतलाय. आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

K Annamalai: अण्णामलाई काय म्हणाले होते?

के अण्णामलाई यांनी म्हटले होते की, मोदीजी हे केंद्रामध्ये आहेत, देवेंद्रजी राज्यामध्ये आहेत आणि बॉम्बेमध्ये भाजपचा महापौर असेल. कारण बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट हे 75 हजार कोटी रुपये इतके आहे. चेन्नईचे बजेट हे 8 हजार कोटी तर बंगळुरुचे बजेट हे 19 हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यामुळे मुंबईचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला चांगले लोक प्रशासनात बसवावे लागतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते. 

Continues below advertisement

Sanjay Raut: ठाकरेंना जास्त सभा घ्यायची गरज नाही

दरम्यान, रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईच्या शिवाजी पार्क येथे जाहीर सभा पार पडली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ठाकरेंना जास्त सभा घ्यायची गरज नाही. कालची सभा परिवर्तन करणारी होती. कालचं भाषण तुफान झालं. आज ठाणेमध्ये सभा आहे. जे प्रेझेंटेशन राज साहेब यांनी केलं ते आतापर्यंत कोणी केलं नाही. दूध का दूध, पाणी का पाणी सर्व काही गौतम अडाणी... शिवसेना कायम उद्योगपतींच्या पाठीमागे राहिली. कारण रोजगार वाढेल, राज्याची आर्थिक स्थिती वाढेल. पण हे मुंबई शहरातील विमानतळ बाहेर काढत आहेत. मुंबई सारख्या शहराला स्वतःचं विमानतळ नसेल, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

आणखी वाचा 

Raj Thackeray: राज ठाकरेंनी मनसेच्या दुखावल्या गेलेल्या मावळ्यांना साद घातली, पक्षाला 'जय महाराष्ट्र' केलेल्यांबाबतही महत्त्वाचं भाष्य; नेमकं काय म्हणाले?