Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,'मविआतील तिन्ही पक्ष मिळून...'
Sanjay Raut on Sharad Pawar: एप्रिल महिन्यात सात राज्यसभा सदस्यांची मुदत संपत असून, त्यामध्ये शरद पवार यांचाही समावेश आहे.

Sanjay Raut on Sharad Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर (Ajit Pawar Death) महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या (NCP Merger) चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे एप्रिल महिन्यात सात राज्यसभा सदस्यांची मुदत संपत असून, त्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावे, अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलंय.
राज्यसभेच्या जागांबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, “एप्रिलमध्ये राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा विचार करता तिन्ही पक्षांचा मिळून एकच उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. कारण तिन्ही पक्षांचे काही सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेऊ,” असे त्यांनी सांगितले.
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार
तसेच शरद पवार यांच्या भूमिकेबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले, "माझी मध्यंतरी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. शरद पवारांना राज्यसभेवर जाण्याच्या विषयांच्या संदर्भात मी त्यांचं मत विचारलं. तेव्हा शरद पवारांनी मला सांगितलं की राज्यसभेची ही निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत. मग आता यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहेत. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत आणि 60 वर्षांपेक्षा जास्त संसदीय कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे शरद पवार यांनी जर ही भूमिका व्यक्त केली आहे आणि त्यांची ही भूमिका त्यांनी काँग्रेसला देखील सांगितली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत याबाबत चर्चा होईल", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
Sanjay Raut on Narhari Zirwal: नरहरी झिरवाळांनी राजीनामा द्यावा
दरम्यान, राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पैसे घेताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नरहरी झिरवाळ यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा द्यावा. नरहरी झिरवळ काय आहेत, हे त्यांच्या तालुक्यातील लोकांनाही माहिती आहे. मंत्रालयातील त्यांचे कार्यालय एसीबीने सील केले आहे. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय ही कारवाई होऊ शकत नाही. लाचखोरी प्रमाणाच्या बाहेर गेली तेव्हा ही कारवाई झाली. नरहरी झिरवाळ यांचे चारित्र्य सगळ्यांना माहिती आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
























