Sanjay Raut on Ind Vs pak T20 World Cup 2026: भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे, त्यांच्यातही अंधभक्त, भारत-पाक सामन्यावर संजय राऊत कडाडले; म्हणाले, 'उद्धव ठाकरेंची...'
Sanjay Raut on Ind Vs pak T20 World Cup 2026: भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळल्याच्या धोरणावरून संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut on Ind Vs pak T20 World Cup 2026: भारताने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये (T20 World Cup 2026) पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये दमदार एन्ट्री मारली. आधी फलंदाजी आणि मग गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर टीम इंडियाने अफलातून कामगिरी करत पाकिस्तानला लोळावलं. या सामन्यात देखील भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळले. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी या धोरणावर कडाडून टीका करत याला 'मूर्खपणा' म्हटले आहे. आपल्यासारख्या देशासाठी ते योग्य नाही एक तर त्यांच्याविरुद्ध खिलाडू वृत्तीने खेळा किंवा खेळूच नका, असे देखील संजय मांजरेकर यांनी म्हटले. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारत-पाक सामन्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, खेळू नका, या मताशी मी पूर्ण सहमत आहे. हा सामना भारत-पाकिस्तान नसून जय शाह विरुद्ध पाकिस्तान असा आर्थिक सामना होता. पैशासाठी खेळायला गेलेला हा सामना होता. तुम्ही त्यांच्यासोबत खेळत आहात आणि मग निकाल लागल्यावर खिलाडू वृत्तीने एकमेकांना हस्तांदोलन केलं पाहिजे. का केले नाही? मग खेळता कशाला? भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे. त्यांच्यामध्ये पण अंधभक्त भिनले आहे. त्यांना सुद्धा ड्रेसिंग रूममध्ये जाऊन धमक्या दिलेल्या आहेत. मांजरेकर यांचे म्हणणं हे शंभर टक्के सत्य आहे. खेळा किंवा खेळू नका. खेळत आहात तर खेळाडू म्हणून खेळा. माझ्या पक्षाची भूमिका आहे की पाकिस्तान सोबत खेळू नका. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही भूमिका आहे. जोपर्यंत पहलगामचा बदला पूर्ण होत नाही, तोपर्यंत खेळू नका, असे त्यांनी म्हटले.
Sanjay Raut on Ind Vs pak T20 World Cup 2026: पाकिस्तान आता हा देश राहिला आहे का?
संजय राऊत पुढे म्हणाले की, हे जबरदस्तीने केले जात आहे. शेक हँड करू नका ही भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची खेळाडूंवरची दादागिरी आहे. खेळताय कशाला? हा शिवसेनेचा प्रश्न आहे. पाकिस्तान खेळले केले नाही तर काय होणार आहे? पाकिस्तान आता हा देश राहिला आहे का? पाकिस्तान सोबत खेळल्याने तुम्हाला फार तर बेटिंगमध्ये हजारो कोटी रुपये मिळतील. त्यातले अर्धे पैसे पाकिस्तानमध्ये जाणार आहेत. ते पैसे दाऊद इब्राहिमकडे जाणार आणि परत दहशतवाद वाढणार, हे काय मोदींना माहित नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























