रुपाली चाकणकरांचा तोल सुटला, कारण...; वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्याच महिला नेत्याची बोचरी टीका
रुपाली चाकणकर यांचा तोल सुटला, कारण त्यांनी प्रशासनात कधी कामच केलेलं नाही, ना त्या निवडून आलेल्या आहेत.

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन राज्यभरात संतापाची लाट पसरली असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांना देखील लक्ष्य केलं जात आहे. रुपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या माहेरी म्हणजेच अनिल कस्पटे यांच्या घरी भेट देत कुटुंबीयांचं सांत्वन केलं. तसेच, याप्रकरणी महिला आयोग आपल्या पाठीशी असून पोलीस योग्य ती कारवाई करत असल्याचेही सांगितले. मात्र, या भेटीदरम्यान काही महिलांनी व मराठा युवकांनी रुपाली चाकणकर यांना अडवून जाब विचारला. महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर, रुपाली चाकणकर यांनीही आता अति होतंय, म्हणत त्यांना फटाकरले. तर, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंकडूनही रुपाली चाकणकरांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच, आता त्यांच्याच पक्षातील महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare) यांनी देखील रुपाली चाकणकरांचा तोल सुटल्याचे म्हटले.
रुपाली चाकणकर यांचा तोल सुटला, कारण त्यांनी प्रशासनात कधी कामच केलेलं नाही, ना त्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे, हे कशा पद्धतीने हँडल करायचं ही कमतरता दिसून आली, त्यामुले हे दिसून आलं, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबर यांनी थेट पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षांवरच टीका केलीय. कस्पटे यांच्या घरी गेल्यानंतर विरोधकांना चिल्लर म्हणणं योग्य नाही. आज ते विरोधक आहेत, कधी आम्ही विरोधक होतो तेव्हा आम्हीही सरकारला घेरायचो. त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं असतं, त्यांनी केलेली कामे सांगितली असती तर विरोधक गपगार झाले असते. पण, विरोधकांना चिल्लर आणि शून्य किंमत अशी वक्तव्य संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने केल्यामुळे पुढील वाद वाढला, असेही रुपाली ठोंबरंनी म्हटले.
सुषमा अंधारेंकडून राजीनाम्याची मागणी
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यातील महिला आयोगाकडून होत असलेल्या दिरंगाईवर आणि दुटप्पी वागणुकीवर टीका होत असून मविआतील महिला नेत्यांकडून रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केलं जात आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर,रुपाली ठोंबरे यांनी वैष्णवीचे बाळ तिच्या आई-वडिलांकडे मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत दाखवलेल्या संवेदनशीलतेबाबत त्यांचं कौतुकही केलंय. दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात अजित पवारांनी एका भाषणात दम भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फरार राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना पोलिसांनी अटक केली होती. तर, त्यांना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या 5 जणांना देखील पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील अटक आठ आरोपींना आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. शशांक,सुशील, राजेंद्र,लता आणि करिष्मा यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, सुनावणीसाठी न्यायालयात वकिलांबरोबर वैष्णवीचे काका मोहन कस्पटे उपस्थित होते.
हेही वाचा
मविआतून विधानसभा लढलेल्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; काकांची साथ सोडून धरला दादांचा हात























