मुंबई : विधीमंडळ सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलेल्या छावा संघटनेच्या प्रदेशाध्यांना जबर मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांचं घटनेच्या महिन्याच्या आत राजकीय पुनर्वसन करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. युवक प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे, नवाब मलिक, समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत सूरज चव्हाण यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. याचे फोटो शेअर करत राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांवर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
काय म्हणालेत रोहित पवार?
लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं?,अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’!, अशा शब्दात रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय प्रकरण?
पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत मोबाईलवर रमी खेळणारे तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. दरम्यान, लातूरमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमानिमित्त आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात छावा या संघटनेचे पदाधिकारी पोहोचले. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला आणि तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले. यावेळी चिडलेल्या सूरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाडगे यांना मारहाण केली. विजय घाडगे यांना कोपऱ्यापासून लाथा-बुक्क्यांपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई होऊन त्यांची राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर आता काही दिवसांमध्येच पुन्हा त्यांच्यावरती मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
अंजली दमानियांनी उपस्थित केले प्रश्न
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सोशल मिडीयावरती पोस्ट केली आहे. "युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद? छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिले. आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. हेच का महाराष्ट्राचे ‘Good Governance?’ मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात? छान!पण …… कमालीची बाब म्हणजे, अगदी २ आठवड्यापूर्वी, मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात, ह्याच राष्ट्रवादी पक्षाने, सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाहीत, ते कार्यालय येत नाहीत असे कोर्टाला लिहून दिले आहे. (फोटो खाली जोडला आहे) मग असे अचानक काय झाले? काही महिन्यांपूर्वी ह्याच पक्षाने ‘जन सन्मान यात्रा ‘ काढली होती. दिसला का ह्यांचा जन सन्मान ?, असंही त्यांनी म्हटलं आहे.