Rohit Pawar on Parth Pawar Pune Land Scam: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या ‘अमेडीया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना मोठा दावा केलाय. मुंबईची निवडणूक (BMC Election) संपली की भाजप एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, पण ती कारवाई करताना कुठेही भेदभाव होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. आम्ही जेव्हा काही प्रकरणं पुढे आणतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा व्यक्ती असेल तर त्याबाबत कारवाई होत नाही. पण कुठे मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई होते. आम्ही सिडको प्रकरण पुढे आणले. त्याप्रकरणात सरकारच्या एका विभागाने सांगूनही संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण पुणे जमीन घोटाळा प्रकरणात सुपरफास्ट कारवाई केली जाते. आमचं मत आहे, भेदभाव न करता कारवाई झाली पाहिजे.
Rohit Pawar on Devendra Fadnavis: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात सगळ्यात मोठे जमीन घोटाळे
भाजपाला कुबड्याची गरज संपलेली आहे, अमित शाह यांनी इथे येऊन सांगितलं की, आम्हाला कुबड्यांची गरज नाही. कुठे ना कुठेतरी कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. काहींची अपेक्षा होती, आदराने कुबड्यांना एखाद्या खोलीमध्ये टांगला जाईल, भिंतीला टांगला जाईल, पण इथे असं दिसतंय की कुबड्या तोडायच्या आणि चुलीत घालायचा भाजपचा प्रयत्न आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जमीन घोटाळे झालेले आहेत, जर कोणी याला जबाबदार असतील तर ते मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा हल्लाबोल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय .
Rohit Pawar on Eknath Shinde: मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार
रोहित पवार पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची गरज भाजपाच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या निवडणुकीसाठी आहे. मुंबईची निवडणूक संपली की एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले जाईल. त्यांना पूर्णपणे राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करू दिले जाणार नाही, अशी भूमिका भाजपची शंभर टक्के असणार आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.
Rohit Pawar on Parth Pawar Pune Land Scam: सुप्रियाताई सुरुवातीला भावनिक झाल्या, पण...
भाऊ, आत्या, आजोबा म्हणून आपण एक वेगळी भूमिका त्या व्यक्तीबद्दल घेऊ शकतो. पण एक राजकीय आमदार म्हणून राजकीय विरोधक म्हणून आपल्याला वेगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका व्यक्त करताना आपण सहसा बघतो आई असलेल्या महिला असतात, त्या थोड्या भावनिक असतात. त्या दृष्टिकोनातून सुप्रिया सुळे यांना अचानक जेव्हा यावर विचारलं तेव्हा त्या भावनिक झाल्या. पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली आणि शरद पवारांनी त्या ठिकाणी आपली राजकीय भूमिका व्यक्त केली. आम्ही शरद पवारांना म्हणणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही त्यांच्या विचाराने काम करणारे लोक आहे, असे देखील रोहित पवारांनी म्हटले आहे.
आणखी वाचा