रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
बारामती विमान दुर्घटनेतील काही गोष्टींचा देखील क्रिमीनल ॲंगलने तपास केला गेला पाहिजे, “काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती.

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाचा अहवाल डीजीसीएकडून समोर आला आहे. या अहवालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज अनेक प्रश्न उपस्थित केले. नागरी उड्डाणमंत्री, डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीचे मालक यांच्यातील जवळीक रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दाखवत गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात आता राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली.
बारामती विमान दुर्घटनेतील काही गोष्टींचा देखील क्रिमीनल ॲंगलने तपास केला गेला पाहिजे, “काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. याची आम्हाला पक्की माहिती नाही. पण त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. याचा सखोल तपास केला गेला पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेतून केली. त्यासंदर्भात आमदार धनंजय मुंडे यांना विचारले असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
रोहित पवारांच्या आरोपावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी करण्यात आली होती? असा आरोपही त्यांनी केला. याबाबत धनंजय मुंडेंना प्रश्न विचारला असता, मला ते कसं करतात याची माहिती नाही. यासंदर्भात जे मांडत नाहीत, त्यांना अनुभव जास्त आहे. काल उठून याविषयावर मांडत आहेत, पण परवा दादांच्याविषयी काहीतरी वेगळंच बोलत होते. हा सगळा संभ्रम आहे, त्यामुळे मी यावर बोलणं उचित नाही, असे मी समजतो, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दिली आहे. मला याबाबतीत अधिक काही बोलायचं नाही, विश्वास-अविश्वास हे, बाकी जशा गोष्टी समोर आल्या तशा येतील. खरं कोण मांडत होतं, खरं कोण भांडत होतं? नेमकं त्याला खरं की खोटं काय माहिती होतं, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले.
रोहित पवार एव्हीगेशन एक्स्पर्ट झाले आहेत - राणे
आमदार रोहित पवार यांनी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर, आता मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. रोहित पवार आता एव्हीगेशन एक्स्पर्ट झाले आहेत, तुमची माहिती फॉर्मल ॲथोरिटीकडे द्या, असे त्यांनी म्हटलं. रोहित पवार आता फक्त पायलट बनायचे बाकी आहेत, देशाचा कायदा रोहित पवार यांना माहीत आहे, असा टोलाच नितेश राणेंनी लगावला.
जयंत पाटील यांच्यावर बोलणे टाळले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल धनंजय मुंडेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, याविषयी मी काही बोलू शकत नाही. त्यावर पक्षाचे नेतृत्व आणि वरिष्ठ नेते बोलतील, असे धनंजय मुंडेंनी म्हटले.
अंजली दमानियांच्या आरोपावर प्रतिक्रिया
कृषी विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी कृषी विभागाने विविध गोष्टी खरेदी केल्या, त्या विषयावर एवढं रान पेटवलं. कोर्टात गेले, तेव्हा हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं की, खोटे पुरावे देऊन हे प्रकरण कोर्टात आणलं. कोर्टाने 1 लाखांचा दंड लावला आणि आम्हाला क्लीन चिट दिली. माझ्याविरुद्ध हा षडयंत्राचाच भाग होता. ते लोकांयुक्तांकडे गेले, त्यांनी सुद्धा क्लीन चिट दिली आणि सांगितलं यामध्ये कुठेही पुरावे नाहीत. त्यामुळे, जे खरं काय आहे ते समोर आल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपावर आणि लोकायुक्तांच्या निर्णयावर दिली आहे. मी कोर्ट आणि लोकांयुक्तांचे आभार मानतो, अंजली दमनिया यांनी केलेले आरोप, आत्तापर्यत त्यांनी संपूर्ण आयुष्यात अनेक नेत्यांवर आरोप केले. मात्र, यातला कोणता आरोप खरा निघाला? माझ्याबद्दल किती मोठं षडयंत्र होतं, असेही मुंडेंनी म्हटलं.

























