Rohini Khadse: मिडल-ईस्टमधील युद्ध आणि एलपीजी (LPG) संकटाचा परिणाम भारतातील विविध भागांत आता स्पष्टपणे जाणवू लागला आहे. अनेक कंपन्यांच्या इमारतींना कुलूप लागण्यास सुरुवात झाली असून, दूरवरून आलेल्या मजुरांना पुन्हा आपल्या गावी परतण्याची वेळ आली आहे. सूरतमधील उधना रेल्वे स्थानकावर रविवारी प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी हजारो लोक स्टेशनवर जमा झाले होते. या गोंधळात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. गुजरातमधील सूरतची परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी महाराष्ट्र सरकारला आवाहन केले आहे. लवकरात लवकर परिस्थितीत सुधारणा करा अन्यथा आपल्या शहरांचीही अवस्था अशीच होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
गुजरातमध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या कमतरतेमुळे स्ट्रीट फूडची दुकाने, छोटे हॉटेल्स-ढाबे बंद पडल्याने त्यांचे मालक बेरोजगार होऊ लागले आहेत. याशिवाय, यूपी-बिहारमधील कामगार आणि हजारो विद्यार्थ्यांनाही आपल्या घरी परतावे लागत आहे. यामुळे सुरत स्टेशनवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Rohini Khadse: झोपलेले सरकार जागे व्हा
या व्हिडिओबाबत त्या म्हणाल्या की, ही दृश्य काळजावर घाव घालणारी आहेत. गुजरातमधील सूरत रेल्वे स्टेशन येथून मोठ्या संख्येने मजूर आपल्या गावी परत जात आहेत. गॅसच्या टंचाईमुळे त्यांच्या हातून रोजगार आणि अन्न दोन्ही हिरावून घेतले गेले आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि सरकार मात्र झोपेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी आपण मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये हॉटेल, खानावळी बंद होण्याचे चित्र पाहिले होते. गावखेड्यातून शिक्षणासाठी, पोटापाण्यासाठी मोठ्या शहरात आलेल्या मुलांचे हाल होताना पाहिले. सरकारने परिस्थिती सुधारली नाही तर मुंबई, पुणे सारख्या शहरातही अशीच अवस्था होईल. झोपलेले सरकार....जागे व्हा, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
