Rohini Khadse on Chitra Wagh : काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या दहशतवादी हल्ल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या घातल्या या प्रश्नावर शरद पवार यांनी हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये कितपत सत्य आहे ते मला माहिती नाही, पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्त्रियांना सोडल्याचं दिसतंय असं वक्तव्य त्यांनी केले. यावरून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आता चित्रा वाघ यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
चित्रा वाघ यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते की, काल काय ऐकले ते पवार साहेबांना आज आठवत नाही. काल गणबोटे ताईंनी आपबिती सांगितली आणि पवार साहेब म्हणतात, धर्म विचारुन मारले,याबाबत मी ऐकले नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
रोहिणी खडसे यांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर
आता चित्रा वाघ यांच्या टीकेला रोहिणी खडसे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे. आमदार झाल्या पण काम ट्रोल आर्मीचं करत आहेत. पहिल्याच वाक्यात अप्रत्यक्षपणे पवार साहेबांच्या वयावर बोलले जात आहे. कधी काळी पवार साहेबांना या बाप म्हणायच्या आज त्यांनाच वयावरून बोलले जात आहे. भाजपात हे नव्याने शिकवले जात आहे बहुतेक. गरज सरो आणि वैद्य मरो या वृत्तीचं काटेकोरपणे पालन झालंय, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, काश्मीरमध्ये जे घडलं त्याकडे संपूर्ण देशवासीयांनी एकजुटीने आणि सरकारसोबत उभं राहून पाहिलं पाहिजे. अशा वेळी राजकारण करू नये. अतिरेक्यांनी जे कृत्य केलं, ते भारताच्या विरोधात होतं. देशाच्या विरोधात निर्णय घेतल्यावर तिथं राजकारण करणं योग्य ठरत नाही. गेल्या काही दिवसांत सरकारकडून सातत्याने सांगितलं जात होतं की, आम्ही दहशतवाद संपवला आहे, आता चिंता करण्याचं काही कारण नाही, असं असेल तर निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पण ही घटना घडल्यावर कुठेतरी कमतरता होती हे स्पष्टपणे जाणवतं. जर सरकारलाही ही कमतरता मान्य असेल, तर त्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. पर्यटकांना हिंदू असल्यामुळे गोळ्या घातल्या यामध्ये नेमकं काय सत्य आहे? हे मला माहीत नाही. पण घटनास्थळी जे लोक उपस्थित होते, त्यामधील महिलांना सोडण्यात आलं असल्याचं दिसतं. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्हाला (महिलांना) हातही लावला नाही. त्यांनी केवळ आमच्या पुरुषांवर हल्ला केला, असं त्यांनी म्हटलं होतं.
आणखी वाचा
