Rohini Khadse on Piyush Goyal : केंद्रीय मंत्री पियूष गोएल (Piyush Goyal) यांनी जोपर्यंत देशातील 140 कोटी नागरिक देशभक्ती आणि राष्ट्रवादाला आपला धर्म मानता नाही, तोपर्यंत अशा गोष्टी (पहलगाम हल्ला) होत राहतील, असे वक्तव्य केले. पियुष गोयल यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत पियुष गोयल यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, केंद्रीय मंत्री पियूष गोएल म्हणतात की, जनतेच्या चुकीमुळे हल्ला झाला. हल्ला झाला तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती? सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? गेली 10 वर्षे संपूर्ण बहुमताचे सरकार असून सत्ताधारी दहशतवाद का संपवू शकले नाही? या प्रश्नांचे उत्तर तर मिळालेच नाही. उलट आता केंद्रीय मंत्री सामान्य जनतेवर खापर फोडत आहे, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय.
खरंतर यांचा राजीनामाच घ्यायला हवा : रोहिणी खडसे
तर रोहिणी खडसे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांचे विधान अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे. खरंतर यांचा राजीनामाच घ्यायला हवा, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांवर पलटवार
दरम्यान, पहलगाम हल्ल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला. काल काय ऐकले ते पवार साहेबांना आज आठवत नाही. काल गणबोटे ताईंनी आपबिती सांगितली आणि पवार साहेब म्हणतात, धर्म विचारुन मारले,याबाबत मी ऐकले नाही, असे त्यांनी म्हटले. यावरून रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. आमदार झाल्या पण काम ट्रोल आर्मीचं करत आहेत. पहिल्याच वाक्यात अप्रत्यक्षपणे पवार साहेबांच्या वयावर बोलले जात आहे. कधी काळी पवार साहेबांना या बाप म्हणायच्या आज त्यांनाच वयावरून बोलले जात आहे. भाजपात हे नव्याने शिकवले जात आहे बहुतेक. गरज सरो आणि वैद्य मरो या वृत्तीचं काटेकोरपणे पालन झालंय, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
