मुंबई : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन सोहळ्यामध्ये भाषण करताना  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील डान्सबारचा मुद्यावर भाष्य केलं होतं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पनवेल (Panvel News) मधील लेडीज बारचा उल्लेख केला होता. छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्सबार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी भर सभेत खेद व्यक्त केला होता. दरम्यान, याच मुद्यावरून आता मनसैनिक आक्रमक झाले आहे. पनवेलमध्ये सुरु असलेल्या लेडीज बारमध्ये मनसेने तोडफोड करत मनसेचा 'खळ खट्याक' पद्धतीचा पवित्रा घेतला आहे. अशातच आता राज ठाकरे यांनी डान्स बार बाबत केलेल्या टिकेनंतर पनवेल मधील मनसे कार्यकर्त्यांनी कोनगाव (पनवेल ) मधील नाईट राईड डान्स बारची तोडफोड केली आहे. याबाबत आता वकिल सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटलांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या जयश्री?

डान्सबारला कधीच बंदी नव्हती. ते म्हणतात की हे डान्सबार अजून सुरूच कसे आणि त्यांनी अभ्यास केला तर कळेल. मॅक्सिमम डान्सबार आहेत ते मराठी लोकांचे आहेत, डान्सबार ऑर्केस्ट्रा या संघटनेची मी वकील आहे, मी खात्रीने आणि अभ्यासपूर्ण सांगते, हे जे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे हे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केले आहे. कशासाठी हे सगळं राज ठाकरे करत आहेत. त्यांना काय वाटतं याच्यातून काय मिळणार आहे, काहीतरी चुकीचं करू नका ज्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. 

शेवटी हा व्यवसाय आहे, काही ठरलेलं नाही इथे असू नयेत, इथे असावं, राज ठाकरे तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय होता? ते मला सांगा बरं, तुम्ही जे शिवाजी पार्क जवळ राहायला गेला ते त्याचं गणित मला सांगा काय आहे? म्हणजे तुम्ही फारच असं मोठं काहीतरी करून गेले आहात असं काही आहे का? कोहिनूर स्क्वेअर बद्दल आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तर तुमचं काय होईल? तुम्ही लोकांचे डान्स बार मोजता, तुम्ही लोकांचे व्यवसाय मोजता, व्यवसाय जिथे चालतो तिथेच केला जातो, असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पनवेल (Panvel News) मधील लेडीज बारचा ही उल्लेख केला होता. छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्सबार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं.