Raj Thackeray-Uddhav Thackeray: यावे जागराला यावे…; ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, संजय राऊतांनी थेट नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंसह कोणा कोणाला निमंत्रण दिलं?
Raj Thackeray-Uddhav Thackeray: 5 जुलै रोजी होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार?, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा (Shivsena UBT-MNS Melava) साजरा करणार आहेत. वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
ठाकरे बंधूंचं हा विजयी मेळावा 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार?, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेचं विजयी मेळाव्याचं पत्रक शेअर केलं आहे. या पत्रकामध्ये वाजत-गाजत येण्याचं आवाहन केलं आहे.
संजय राऊतांनी थेट नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंसह कोणा कोणाला निमंत्रण दिलं?
संजय राऊत यांनी या विजयी मेळाव्याचं निमंत्रण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक्सवर टॅग करत दिले आहे. सोबतच महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड...यावे जागराला यावे…, असंही संजय राऊतांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2025
यावे
जागराला यावे…
@Dev_Fadnavis
@AmitShah
@narendramodi
@mieknathshinde pic.twitter.com/zWPWPOUB9U
ठाकरे बंधूंचं सर्वांना एकत्र आवाहन-
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक पत्रक काढत सर्वांना आव्हान केलं आहे. आवाज मराठीचा...असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं..., कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं...आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या...आम्ही वाट बघतोय..., असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पत्रकाच्या शेवटी पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं नावंही देण्यात आले आहे.

























