Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
पक्षाच्या 20व्या वर्धापन दिनी राजा ठाकरे नेमकं काय भाष्य करत कार्यकर्त्यांना कानमंत्र देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र असं असताना राज ठाकरेंनी या सोहळ्यापूर्वी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Raj Thackeray MNS Vardhapan Din : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (9 मार्च) वर्धापनदिन आहे. पण यंदाचा वर्धापनदिन हा मनसैनिकांसाठी खास असणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी हा मनसेचा वर्धापणदिन सोहळा साजरा केला जात आहे. यासाठी खास सोहळ्यासाठी पक्ष प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) कुटुंबियांसह पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन केलंय. तर आज रायगड किल्ल्याच्या पायथ्याला राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, पक्षाच्या 20व्या वर्धापन दिनी राजा ठाकरे नेमकं काय भाष्य करत कार्यकर्त्यांना कानमंत्र देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र असं असताना राज ठाकरेंनी या सोहळ्यापूर्वी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मधूनराज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापनदिनी काळजाला साद घालणारं आवाहन केल्याचंबोललंजातआहे.
राज ठाकरेंची सोशल मिडीया पोस्ट (Raj Thackeray Social Media Post)
पोस्टमध्ये राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटलंय की, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज पक्षाच्या स्थापनेला २० वर्ष झाली. २० वर्ष हा तसा दीर्घ टप्पा असतो, मग तो व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या आयुष्यातील.
२० वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन या पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे आज फक्त पक्षाला नाही तर या कल्पनेला वीस वर्ष झाली. ही कल्पना आज दृढ झाली आहे , पण २० वर्षांपूर्वी मराठी माणूस, भाषा, अस्मिता या सर्व गोष्टींचा सर्वांना विसर पडला होता तो जागृत करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं हे सर्वांना मान्यच करायला हवं! मधल्या काळात आपण अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवडणुका लढवल्या कधी यश मिळालं कधी नाही मिळालं पण या सगळ्या प्रवासात मराठी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लोकांच्या मनात बिंबलं. आज कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला तर कुठे आहे मनसे असं इतर राजकीय पक्षांचे समर्थक पण विचारतात यातच आपण काय कमावलं आहे याचा अंदाज येईल.
गेल्या २० वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. महाराष्ट्रात पूर्ण एक नवीन पिढी आता मतदार झाली आहे. पक्ष स्थापनेच्या वेळेस आपल्याच सहकाऱ्यांची त्यांच्या कडेवर असणारी मुलं आता मतदार झाली आहेत, उत्तम काम करत आहेत. ही मुलं तरी आपलीच आहेत, पण महाराष्ट्रात आज जगाला गवसणी घालण्याचं स्वप्न आणि जिद्द बाळगणारी मुलं प्रत्येक तालुक्यात आहेत. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि ती क्रांती महाराष्ट्रात घडावी आणि इतकंच नाही तर हे सगळं आपल्या भाषेत घडावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना उत्तम आयुष्य म्हणजे काय असावं हे माहित असावं आणि त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी देखील असावी तर आणि तरच महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमानात आणि भविष्यात यावा हीच आमची इच्छा आणि अपेक्षा !
अशा सर्व होतकरू मराठी तरुण-तरुणींना आज तुम्हाला महाराष्ट्राचे पाईक होण्याची संधी आहे. उद्या १० मार्च २०२६ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरु होत आहे. त्यात तुम्ही सहभागी व्हा. तुमची राजकीय विचारधारा, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही आमच्यासारखेच महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हेच जगाला दिसावं हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आणि तुम्ही सदस्य झालात म्हणजे नुसते महाराष्ट्र सैनिकच नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात हे लक्षात घ्या. एक नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, तुम्ही पक्षाचे सक्रिय सभासद पण होऊ शकता ! या फॅार्म मधे शेवटी हा पर्याय पण दिलेला आहे त्यावर होकार कळवावा , माझे सहकारी आपल्याशी संपर्क साधतील !
त्यासाठी ही सदस्य नोंदणीची संधी सोडू नका. माझे सर्व सहकारी आपल्या भागात प्रत्यक्ष असतीलच परंतू तिथे शक्य नसेल तर त्यासाठीच्या संकेतस्थळाची लिंक उद्या सुरु होत आहे. तेंव्हा याचा लाभ घेत जरूर सदस्य व्हा.
तुमचं मनःपूर्वक स्वागत असेल.
इतर महत्वाच्या बातम्या





















