Raj Thackeray MNS Meeting: काल एकनाथ शिंदेंची भेट, आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक; राज ठाकरे म्हणाले, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते!
Raj Thackeray MNS Meeting: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती.

Raj Thackeray MNS Meeting: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी मराठी भाषा दीन, वर्धापन दिन आणि पाडवा मेळावा जिल्हापरिषद,पंचायत समिती नगर पालिका निवडणुका या संदर्भात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच राज ठाकरेंनी बोलावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेमकं काय काय घडलं?, याची इनसाईड स्टोरी देखील एबीपी माझाच्या हाती लागली आहे. (Raj Thackeray MNS Meeting)
राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीची इनसाईड स्टोरी- (Raj Thackeray MNS Meeting)
सध्याचा आपला कार्यक्रम असणार तो म्हणजे निवडणूक...यापुढे फक्त निवडणुकींवर लक्ष द्या… तीन वर्ष निवडणुका नाही. त्यामुळे आता पक्ष बांधणीला सुरुवात करा, अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. सत्तेत असणाऱ्यांची देखील एक्सपायरी होणार… कायमस्वरूपी काय नसतं, असं विधानही राज ठाकरेंनी केलं.
20 वर्षांनंतर पुन्हा मनसेचा योगायोग- (MNS Gudipadwa Melava 2026)
20 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मनसेची पक्ष स्थापना केली. आणि त्यानंतरची पहिली महासभा 19 मार्चला शिवतीर्थ येथेच झाली होती. आता पुन्हा 19 मार्चला गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांची सभा होणार आहे. 19 मार्चला मनसेचा शिवतीर्थ येथे गुढीपाडवा मेळावा आयोजित केला जाणार आहे. मराठी भाषादिनासोबत गुढीपाडवा देखील जोरात साजरा करण्याचे आदेश राज ठाकरेंनी आजच्या बैठकीत दिले आहेत. मराठी भाषा दिन जोरात साजरा करा, पक्षाला 20 वर्षे झाली स्थापना होऊन आणि 19 मार्चला शिवतीर्थावर सभा आहे, असंही राज ठाकरेंनी सांगितले.
एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरे काय म्हणाले? (Raj Thackeray On Eknath Shinde Meet)
आपल्याकडे आता पूर्वीसारखं राजकारण राहिलेलं नाहीय. आता काही नाहीय. निवडणुका संपल्या आहेत. आम्हाला जर काही सांगायचे असेल, काही चांगल्या गोष्टी करुन घ्यायच्या असतील, तर भेट घेतलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायची गरज नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. मी त्याचदिवशी बोलणार होतो. आपल्याकडे चांगले रस्ते, फ्लायओव्हर्स व्हावेत चांगली गोष्ट आहे. मात्र आपण मूळ गोष्टाली हात घालत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होते आहे त्याचा लोकांना किती त्रास होतोय, मलाही होतोय. लोकांकडे एकापेक्षा जास्त कार असतात. अनेक इमारतींमध्ये पार्किंगचा मोठा मुद्दा आहे. मागे हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितली होती. त्यांनी लगेच भूषण गगराणींना फोनकरून सांगितले होते, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. तसेच काल एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही भेटेन, असंही राज ठाकरे म्हणाले.
























