Raj Thackeray On Gautam Adani: मुंबईतील सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोदी सरकार फक्त अदानींवरच मेहरबान का असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी 2014 पासूनचे अदानींचे (Gautam Adani) वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जागं होण्याचं आवाहन केलं. तसेच अदानी समुहाचा वाढता विस्ताराबाबत काही व्हिडीओही राज ठाकरेंनी सभेत दाखवले. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. गौतम अदानी यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या दरम्यानचा फोटो भाजपकडून शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये गौतम अदानींसह राज ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेही होत्या. हा फोटो राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानमधील होता. आता भाजपने शेअर केलेल्या या फोटोवर राज ठाकरेंनीही ठाण्यातील कालच्या सभेतून उत्तर दिलं आहे. 

मी अदानींवर टीका केल्यानंतर काही जणांना खूप मिरच्या झोंबल्या. माझा आणि अदानींचा फोटो भाजपकडून दाखवला जातोय. दोन वर्षांआधीचा वैगरे हा फोटो असेल. अदानी माझ्या घरी येऊन गेले होते. घरी आल्यावर मी काय हाकलून देऊ का?, माझ्या घरी गौतम अदानीही येऊन गेले, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेले, अंबानी, आनंद महिंद्राही येऊन गेले. म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट येईल, ज्यावेळी मुंबई-ठाणे यांसारख्या आमच्या शहरांवर संकट येईल. राज ठाकरे दोस्ती वगैरे बघणार नाही, असं राज ठाकरेंनी ठणकावले. एक विमानतळ आणि एक पोर्टसोडून अदाणींचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव आणि मोदींचं नाव याच्या जोरावर हा माणूस देशभर पसरत गेलाय, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. 

येत्या 15 तारखेला आपण सर्व सतर्क राहा, कुठेही गाफील राहू नका- राज ठाकरे (Raj Thackeray Thane)

निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे याचा आपण नीट विचार केला पाहिजे. ठाण्याचे अनेक प्रश्न आहेत जशी इथं लोकसंख्या वाढत आहे तसेच प्रश्न सुद्धा वाढतायेत. हे संकट सध्या तुमच्या उंबरठ्यावर उभं आहे. कोणत्याही क्षणी दरवाजा ठोठावेल. त्यामुळे आज जर चुकाल तर फसाल. हे ठाणं आपलं आहे. हे ठाणं टिकवणं, यांनी जो आराखडा आखला आहे तो उध्वस्त करणं तुमच्या हातात आहे. आम्हाला सत्तेचा हव्यास नाहीये वाईट या गोष्टीचं वाटतं डोळ्यादेखत ही शहरं जाऊ नये. डोळ्यादेखत इतरांनी ही शहरं घेऊ नयेत एवढ्यासाठीचं हे युद्ध सुरू आहे. येत्या 15 तारखेला आपण सर्व सतर्क राहा, कुठेही गाफील राहू नका. जर दुबार मतदार मतदान करायला कोणी आले तर तिथेच कानफडवायचे, असा आदेश राज ठाकरेंनी दिला. 

संबंधित बातमी:

Devendra Fadnavis on Adani: गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले...