Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचा जन्म, सामनाच्या अग्रलेखाने संपूर्ण महाराष्ट्राचं वेधलं लक्ष, ठाकरे बंधू एकत्र येणार?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: आजच्या सामना अग्रलेखातून महाराष्ट्राला आणखी काय हवे? असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा राजकारणात नेहमी होते. आता खुद्द दोन्ही ठाकरे बंधूंनी यासाठी एकेक पाऊल पुढे टाकलंय. राज ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी लागलीच त्यांना प्रतिसादही दिला. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरुन राज्यातील विविध पक्षातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत सकारात्मक असल्याचं मत व्यक्त केलं. त्यानंतर आजच्या सामना अग्रलेखातून महाराष्ट्राला आणखी काय हवे? असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. भाजपचे राजकारण हे 'वापरा आणि फेका' या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केले. महाराष्ट्रात कृष्णा-कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा व त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावे ही त्यांची भूमिका नाही. प्रयागराजच्या गढूळ, अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवले व धर्माचा धंदा केला. महाराष्ट्रातील मराठी जनतेने बोध घ्यावा व प्रत्येक पाऊल जपून टाकावे असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे, असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.
भाजप, 'एसंशिं' वगैरे लोक 'राज' यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ले-
राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत या बातमीने देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या बातमीने अनेकांना आनंद झाला तसे अनेक जण पोटदुखीने बेजार झाले. राज ठाकरे यांचे आतापर्यंतचे राजकारण नागमोडी पद्धतीचेच होते व ते फारसे यशस्वी झाले नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी 'मनसे' या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्या वेळी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना लोकांचे बऱ्यापैकी समर्थन मिळाले, पण पुढे त्यांच्या पक्षाला ओहोटी लागली. भारतीय जनता पक्ष, 'एसंशिं' वगैरे लोक 'राज' यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ले करीत राहिले. यात राज यांच्या पक्षाचा राजकीय लाभ झाला नाही, पण मराठी एकजुटीचे अतोनात नुकसान झाले. मोदी व शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका ही राज यांची भूमिका होती. शहा-मोदी हे महाराष्ट्र हिताचा विचार करत नाहीत अशी राज यांची भूमिका होती. त्या भूमिकेला ते चिकटून राहिले नाहीत. भाजपचे हिंदुत्व नकली व तकलादू आहे. या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपने राज यांना अडकवले व गाडे घसरत गेले. आता त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, "झाले ते झाले, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण किरकोळ आहे. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे या मला फार कठीण गोष्टी वाटत नाहीत. विषय फक्त इच्छेचा आहे."
महाराष्ट्राचे कल्याणापुढे मतभेद वगैरे शून्य-
राज ज्यास आमच्यातील वाद म्हणतात ते उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहेत. हे वाद कसले? ते कधीच बाहेर आले नाही. राज मराठी माणसांविषयी बोलत राहिले व शिवसेनेचा जन्मच मराठी हितासाठी झाला आणि ते हित उद्धव ठाकरे यांनी सोडले नाही. मग वाद असले? राज यांच्या वतीने भाजप, मिंधे वगैरे लोकच बोलू लागले व तसे बोलण्याचे काहीच कारण नव्हते. या लोकांनी वाद सुरू केले. त्यामुळे भाजप, मिंधे या लोकांना दूर ठेवले तर वाद राहतोच कोठे? एकत्र येण्यासाठी इच्छा हवी. राज म्हणतात ते खरे आहे, पण कोणाच्या इच्छेविषयी ते बोलत आहेत? राज यांनी त्यांची इच्छा व्यक्त करताच उद्धव ठाकरेही मागे राहिले नाहीत व महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी त्यांनीही दमदारपणे एक पाऊल पुढे टाकले. काही किरकोळ वाद असलाच तर तो बाजूला ठेवून मीसुद्धा महाराष्ट्र हितासाठी एकत्र काम करायला तयार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. ही महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली तुतारी आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान व महाराष्ट्राचे कल्याण यापुढे मतभेद वगैरे शून्य आहेत, पण राज यांनी महाराष्ट्राच्या शत्रूच्या पंगतीला यापुढे बसू नये व महाराष्ट्रद्रोह्यांना घराच्या उंबरठ्याबाहेरच ठेवावे ही माफक अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली असेल तर त्यास कोणी अट किंवा शर्त मानू नये. महाराष्ट्राच्या शत्रूना घरात थारा देऊ नये असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामागे एक वेदना आहे.
शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला-
अमित शहा, मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वार केले. याच शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेइमानी करणाऱ्यांना पंगतीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार? हा साधा सरळ प्रश्न आहे. शिंदे व त्यांचे लोक हे मोदी-शहांचे मिंधे आहेत. फडणवीस यांच्या महाराष्ट्रप्रेमाचे ढोंग वारंवार उघडे पडले आहे. मुंबई या लोकांनी विकायला काढली व महाराष्ट्र लुटीचे 'टेंडर' काढले ते अमराठी ठेकेदारांना दिले. धारावीच्या निमित्ताने संपूर्ण मुंबई गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात घातली जात असताना मराठी माणूस मुंबईचा हा विस्कोट उघड्या डोळ्ळ्याने, एका हतबलतेने पाहत आहे. मुंबईत इतर समाज संकटकाळी एकवटून कडवटपणाने उभा राहतो, परंतु हाच एकजुटीचा मराठी बाणा आज खिळखिळा झाला आहे. विलेपार्ले हा एकेकाळी मराठी संस्कृतीचा अभेद्य गड, परंतू परवा तेथील एका जैन देरासरवर महापालिकेची कारवाई होताच काही क्षणांत हजारो जैन बांधव एकवटले व त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून पालिकेच्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करायला भाग पाडले. मुंबईत इतर जातीय व धर्मीय बांधव एकजुटीने राहतात आणि भाजपसारख्या व्यापारी वृत्तीच्या पक्षांना पाठबळ देतात. हे महाराष्ट्राच्या पर्यायाने मराठी माणसांच्या मुळावर येणारे आहे.
राज ठाकरे यांना या एकजुटीचे महत्त्व पटले आणि उद्धव ठाकरे यांनीही मनमोकळेपणाने प्रतिसाद दिला-
मराठी माणसाची एकजूट कमजोर केली की, महाराष्ट्रापासून मुंबईचा तुकडा पाडता येईल हे भाजप व त्यांच्या व्यापारी मंडळाचे सरळ गणित आहे. म्हणूनच त्यांनी मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणारयांचे डोळे काढून हातात देणाऱया मराठी एकजुटीवर प्रहार करण्याचे सातत्याने प्रयत्न केले. मराठी एकजुटीची वज्रमूठ असलेल्या शिवसेनेवरही त्यांनी घाव घातला आणि त्यासाठी कुन्हाडीचा दांडाच वापरण्यात आला. चार वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. महाराष्ट्र विधानसभा भाजप व त्यांच्या व्यापारी मंडळाने कशा जिंकल्या त्याचे गणित वॉशिंग्टन मुक्कामी असलेल्या तुलसी गबार्ड यांनी सांगितलेच आहे. अर्थात, या सगळ्या महाराष्ट्रद्रोह्यांशी लढण्याची हिंमत आणि ताकद फक्त मराठी माणसात आहे. त्यामुळे मराठी माणसाने एकत्र यायलाच हवे. राज ठाकरे यांना या एकजुटीचे महत्त्व पटले आणि उद्धव ठाकरे यांनीही मनमोकळेपणाने प्रतिसाद दिला. महाराष्ट्रद्रोह्यांची दाणादाण उडवणारी ही राजकीय घडामोड आहे. दोन 'बंधू' एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा येऊन ते चिडचिडपणा करू लागले, तर काही जण चेहन्यावर खोटा आनंद आणून "व्वा, छान! दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदच" असे सांगत आहेत, पण महाराष्ट्रद्रोह्यांचा हा आनंद खरा नाही. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडावे. वाद, भांडणे यात उभे आयुष्य गेले तर महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत. भाजपचे राजकारण हे 'वापरा आणि फेका' या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केले. महाराष्ट्रात कृष्णा-कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा व त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावे ही त्यांची भूमिका नाही. प्रयागराजच्या गढूळ, अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवले व धर्माचा धंदा केला. महाराष्ट्रातील मराठी जनतेने बोध घ्यावा व प्रत्येक पाऊल जपून टाकावे असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे.
टाळी दिली, राज उद्धव एकत्र येणार?, VIDEO:
संबंधित बातमी:
Before You Go
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला























