मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज थेट दुचाकीवरून विधान भवन गाठल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः 'रॉयल एनफिल्ड 350' ही बाईक चालवत विधान भवनात (Mumbai) दाखल झाले. विशेष म्हणजे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफादेखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीवरुन आता राजकारण तापलं आहे. वर्षा गायकवाड यांनी संबंधित बुलेटची कागदपत्रे शेअर करत त्या दुचाकीची पीयुसी कालबाह्य झाल्याचं म्हटलं. त्यावर, आता भाजपच्या (BJP) मुख्य प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या बुलेटची पीयुसी कालबाह्य झाल्याची बाब वर्षा गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आता भाजपने पलटवार केला आहे. सर्व्हर बंद असल्याने प्रमाणपत्र प्रलंबित आहे, मात्र काँग्रेस खोटं पसरवत आहे, असे उत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिले. तसेच, ‘इधर-उधर की बात ना कर’; आधी पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा देणार की नाही हे सांगा, असा सवालही बन यांनी काँग्रेसला विचारला आहे.
वर्षाताई, सदर वाहन हे पोलिस विभागाचे आहे. ते स्वतः मुख्यमंत्री महोदय चालवणार असल्याने पोलिसांनी योग्य खबरदारी आधीच घेतली होती. काल त्याची सर्व्हिसिंग सुद्धा झाली. वाहन प्रणालीवर 9 ते 18 मे पर्यंत कामकाज बंद असल्याने त्यांनी हे वाहन पर्यावरणीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा आधीच घेतले होते. जनतेच्या मनातून उतरलेली काँग्रेस आता कागदपत्रांमधील तांत्रिक बाबींवरून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हणत नवनाथ बन यांनी बुलेटच्या पीयुसीबाबतही खुलासा केला आहे. तसेच, वर्षाताईंनी ट्वीट करण्यापूर्वी सत्य पडताळून पाहिलं असतं, तर स्वतःचीच फजिती टळली असती, असा टोलाही त्यांनी लगावला. तर, मूळ प्रश्न आपण पंतप्रधान महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की नाही, हा आहे. त्याचे उत्तर आधी द्या, 'तोवर इधर-उधर की बात ना कर', असेही बन यांनी म्हटलं आहे.
“Expired Maal” म्हणत वर्षा गायकवाडांची टीका
मुख्यमंत्र्यांनी जी बुलेट विधानभवनात येण्यासाठी वापरली होती, त्या बुलेटची पीयुसीची मुदत संपल्याचं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका करताना, एक्सायरडं माल अशा शब्दात राहुल गांधी हे राजकारणातील एक्सपायरडं माल असल्याचं म्हटलं होतं. आता, वर्षा गायकवाड यांनीही तोच धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. विधानभवनात येण्यासाठी वापरलेल्या बुलेटची पीयुसी एक्स्पायर झाली होती, त्याच अनुषंगाने, तर “Expired Maal” चालतं का? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या साधनेसाठी, स्टंटसाठी ज्या वाहनाची निवड केली, त्याचे PUC मुदतबाह्य झालेलं होतं, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी कागदपत्रेही शेअर केली आहेत.
