Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar : राज्य सरकारनं भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद (Bhandara Guardian Minister) बदलण्याचा निर्णय घेतला आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) हे या आधी भंडाऱ्याचे पालकमंत्री म्ह्नणून कामकाज पाहत होते. मात्र आता त्यांच्याऐवजी भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संजय सावकारे यांना अचानक डिमोशन का करण्यात आले? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आता भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री पंकज भोयर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 


पंकज भोयर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, वरिष्ठ नेतृत्वाचे मी आभार व्यक्त करेल. मागील सहा ते सात महिन्यांपासून जे काम सुरू आहे त्याची दखल त्यांनी घेऊन माझी जबाबदारी वाढवलेली आहे. वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिलेल्या जबाबदारीची पूर्ण जाण ठेवून मी चांगल्या पद्धतीने भंडारा जिल्ह्यात येणाऱ्या काळात काम करून दाखवेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  


संजय सावकारे यांचे देखील काम अतिशय चांगले


संजय सावकारे यांना पदावरून का काढण्यात आले? याबाबत विचारले असता पंकज भोयर म्हणाले की, याबाबत मला कल्पना नाही. परंतु संजय सावकारे यांचे देखील काम अतिशय चांगले आहे. कदाचित भौगोलिक दृष्ट्या त्यांना भंडारा जिल्हा दूर पडत असावा, त्यामुळे असा निर्णय घेतला असावा. संजय सावकारे यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होते, असे त्यांनी म्हटले आहे.  


वर्धा जिल्ह्यातील योजना भंडाऱ्यात राबवणार


भंडारा जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून आपल्या काय योजना असणार आहेत? असे विचारले असता पंकज भोयर म्हणाले की, अनेक योजना आहेत. ज्या वर्धा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून मी उपलब्ध करून दिल्या होत्या, त्याची अंमलबजावणी भंडारा जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही करू, असे त्यांनी म्हटले आहे. 



इतर महत्त्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis On Manoj Jarange: एकनाथ शिंदे अन् अजितदादांना मराठा आरक्षणाचं काम करु दिलं नाही; मनोज जरांगेंच्या आरोप, देवेंद्र फडणवीस म्हणाले...


Mumbai Crime News: सूरतमध्ये अपहरण, मुंबईत संपवलं; रेल्वेत AC कोचच्या शौचालयात टाकली बॉडी; मावस भाऊच निघाला चिमुकल्याचा मारेकरी