Election 2025 : विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. डिसेंबर महिन्याच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत असून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटकपक्ष या निवडणुकीत एकत्र लढणार की स्वबळावर लढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मोठी घोषणा केली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई वगळता सर्व ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फक्त मुंबईत महायुती म्हणून एकत्र लढण्यावर विचार करत आहोत. मात्र उर्वरीत राज्यात स्वतंत्र निवडणुकीला आम्ही पुढे जावू. त्यामुळे पक्ष वाढीस मदत होते, स्थानिक स्तरावर स्थानिक नेत्यांना युती करायची असेल तर तो त्यांचा अधिकार असेल. आम्ही त्यात बोलणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर मेघालय, मणिपूर, बिहारमध्ये निवडणुका लढणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. 

...तर आमचा पक्ष कसा वाढेल?

मंत्र्यांनी विदर्भात पर्यटन म्हणून येऊ नये. इथे यायचं असेल तर योग्य रितीने आपल्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, अशा पद्धतीनं या. नाही तर दोन तासांचे पर्यटक म्हणून यायचं आणि मुंबईत जाऊन दादा आणि तटकरे साहेबांसमोर येतात. मी या जिल्ह्यात जाऊन आलो, हे करुन आलो, याला काही अर्थ नाही, असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्र्यांचे कान टोचले. याबाबत विचारले असता प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मी जे वक्तव्य केले ते फक्त विदर्भातील पालकमंत्र्यांपुरते नाही तर आमच्या सर्व पालकमंत्र्यांसंदर्भात बोललो. आमच्या पालकमंत्र्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले नाही तर मग आमचा पक्ष कसा वाढेल? बाहेरच्या जिल्ह्यातून आलेला पालकमंत्री असला तरी पक्षाचे कार्यकर्ते असतात. त्यांच्या सोबत समन्वयाने काम करायला हवे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री पक्ष बांधणीकडे पाहिजे तसे लक्ष नाही, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Devendra Fadnavis On Gopichand Padalkar: जयंत पाटलांवर गलिच्छ शब्दात टीका, देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान; म्हणाले...