Nashik Vidhan Parishad Election 2026: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) आणि जळगाव (Jalgaon) स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीने (Vidhan Parishad Election 2026) आता अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय वळण घेतले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अधिकृत दिवस उलटून गेल्यानंतरही, महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) वरिष्ठ नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण राजकीय घडामोडींमुळे भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Continues below advertisement

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकमध्ये बंडखोरांची मनधरणी 

नाशिक विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीची मुदत संपली असली, तरी भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी निवडणुकीतून प्रत्यक्ष माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून (Mahayuti) मनधरणीचे राजकारण सुरू आहे. रविवारी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते तसेच प्रसाद हिरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

आज पुन्हा सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान महाजन आणि सामंत हे हिरे आणि गिते यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. मात्र, सध्या गोकुळ गिते हे पेठ तालुक्यात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे पेठ दौऱ्यावर असताना गोकुळ गिते हे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार का? आणि भाजपचे बंडखोर उमेदवार माघार घेणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

Jalgaon Vidhan Parishad Election 2026: नाशिकच्या घडामोडींवर जळगावचा तिढा अवलंबून

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील बंडखोरीच्या माघारीवरच जळगाव निवडणुकीचा तिढा अवलंबून आहे. जळगावमध्ये संख्याबळाच्या आधारे सहज विजयाचा दावा करणाऱ्या भाजपची (BJP) चिंता आता चांगलीच वाढली आहे. येथे भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाशी संबंधित रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी करत भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यांच्या सोबतीला ठाकरे गट आणि इतर अपक्ष उमेदवारांनीही रिंगणात उडी घेतली आहे.

Jalgaon Vidhan Parishad Election 2026: रेश्मा काळे यांचा माघारीस नकार

बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची समजूत काढण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी आणि मध्यस्थांनी अनेक बैठका घेतल्या. मात्र, काळे यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार देत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे महायुतीमधील अंतर्गत नाराजी आणि स्थानिक राजकीय समीकरणे उघड झाली आहेत. जरी कागदावर संख्याबळ भाजपच्या बाजूने असले, तरी या अंतर्गत बंडखोरीमुळे मतदानाच्या वेळी छुप्या मतदानाचा धोका नाकारता येत नाही. परिणामी, निवडणुकीत कोणताही अनपेक्षित निकाल लागू शकतो, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम