Nana Patole on Bacchu Kadu : प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे गेल्या सात दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला असून, सरकारने तात्काळ पावले उचलली नाहीत तर राज्यभर शेतकरी आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांवरुन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळातून त्यांचे मागण्यांचे समर्थन केले जात आहे. आता काँग्रेसकडून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
आंदोलनाची दखल घेऊन मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात
नाना पटोले यांनी म्हटले की, बच्चू कडू हे ज्या महायुती सरकारचा एक भाग होते, त्याच सरकारकडून आता त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जातंय, हे अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेस बच्चू कडू यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देते. सरकारनं बच्चू कडू यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या तातडीनं पूर्ण कराव्या. कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांचे बोनस असेल, नुकसान भरपाई असेल या सर्व मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन काँग्रेस राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात, तालुका आणि गावस्तरापासून शेतकरी आंदोलन उभं करेल. शेतकरी विरोधी महायुती सरकारचा निषेध केला जाईल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामाला सरकारच जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बच्चू कडूंच्या मागण्या पुढीलप्रमाणे
1. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी.
2. दिव्यांग व विधवा महिलांना रु. 6000/- मानधन देण्यात यावे.
3. आपत्कालीन संकटमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करून देण्यात यावे तसेच शेतमालाला MSP (किमान दर) वर 20% अनुदान देण्यात यावे.
4. दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिबृत्तानुसार शासन निर्णय काढण्यात यावे.
5. वंचित घटकांना वगळता सर्व गोरगरीब समांतर राहणाऱ्या व सन्मानजनक वागणूक हवी असलेल्या व सध्या विविध अडचणीत असलेल्या घटकांनाही सन्मानजनक घरकुल द्यावे.
6. शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान रु. 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.
7. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून रु. 10 लाख आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
8. रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना MREGS मध्ये घेण्यात यावे तसेच फळपीकांत 3:5 प्रमाण लागू करून MREGS मध्ये जोडण्यात यावे. दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात रु. 1000/- मजुरी दिली जावी.
9. संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी.
10. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी.
11. 100% दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीत 5% आरक्षण देण्यात यावे.
12. शासकीय नोकर भरतीत इतर मागास प्रवर्ग (OBC) चे आरक्षण 27% ठेवावे.
13. शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा. विमा हप्त्याचे 50% पेक्षा जास्त शुल्क शासनाने द्यावे.
14. शेतकऱ्यांना खत, बियाणे विनाशुल्क द्यावे.
15. शेतीसाठी लागणाऱ्या वीजेचे बील माफ करून सतत वीजपुरवठा करण्यात यावा.
16. शेतमालास हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी.
17. धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावे.
आणखी वाचा
दिव्यांगांना 6000 रु मानधन, कर्जमाफीसाठी काय ठरलं?; बच्चू कडूंनी सांगितली सरकारसोबतची चर्चा
