Vijay Lakshami Bidri on Congress : पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
Vijayalakshmi Bidari on Congress : आम्ही कोणाच्याही दबावाखाली काम करण्याचे कुठलेही कारण नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने प्रशासनावर अनावश्यक टीका केली, असेही विभागीय आयुक्त म्हणाल्या आहेत.

Chandrapur Mayor Election : चंद्रपूरमधील (Chandrapur) गट नोंदणीच्या प्रकरणात काँग्रेस पक्षाकडून प्रशासनावर अनावश्यक टीका करण्यात आलीय. एका लोकप्रतिनिधींनी तर आम्ही दबावात काम करत असल्याचे बिनबुडाचे आरोप केले. असे आरोप करण्याची कोणतीही गरज नव्हती, अशा शब्दात नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी (Vijay Lakshami Bidri) यांनी या संपूर्ण वादात पहिल्यांदाच त्यांचे मत व्यक्त केले आहे. एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना विभागीय आयुक्तांनी काँग्रेसच्या गट नोंदणी प्रकरणातील प्रत्येक बाब स्पष्टरित्या सांगितली. एकाच राजकीय पक्षात दोन तीन गट नोंदवण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष एकत्रित आल्याशिवाय आम्हाला गट नोंदणीची कुठलीही कायदेशीर संधी नव्हती. काँग्रेसच्या (Congress) दोन्ही गटांनी एकत्रित येण्यासाठी एवढे दिवस लावले, यात प्रशासनाची काय चूक? आम्ही कोणाच्याही दबावाखाली काम करण्याचे कुठलेही कारण नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने प्रशासनावर अनावश्यक टीका केली, असेही विभागीय आयुक्त म्हणाल्या आहेत.
Vijayalakshmi Bidari on Congress : एकाच पक्षात दोन गट नोंदवल्याचे एक तरी उदाहरण आम्हाला सांगा
दरम्यान, कायद्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की एका चिन्हावर निवडून आलेले सर्व नगरसेवक म्हणजेच एक राजकीय पक्ष. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कायद्याप्रमाणे त्या राजकीय पक्षात मित्र पक्षाला विलीन (merge) करता येते, मात्र विभाजन (split) करता येत नाही. यापूर्वीही राज्यात अनेक ठिकाणी एका पक्षात दोन गट नोंदवण्याची मागणी झाली. तेव्हा तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळे गट नोंदवण्यास नकार दिले. एकाच पक्षात दोन गट नोंदवल्याचे एक तरी उदाहरण आम्हाला सांगा असे आम्ही काँग्रेसच्या वकिलांना वारंवार सांगितले. मात्र ते एकाच राजकीय पक्षात दोन वेगवेगळे गट नोंदवल्याचे कुठलेही उदाहरण आमच्यासमोर ठेवू शकले नाही, असेही विजयालक्ष्मी बिदरी म्हणाल्या.
काँग्रेसचा एक गट 23 जानेवारी रोजी गट नोंदवायला आला त्यावर उर्वरित नगरसेवकांनी आक्षेप घेतले. दुसरा गट 2 फेब्रुवारी रोजी गट नोंदणीसाठी आला त्यासंदर्भात पहिल्या गटातील नगरसेवकांनी आक्षेप नोंदवले. गट नोंदणीच्या त्यांच्या प्रक्रियेत असलेल्या त्रुटी आम्ही त्यांना दाखवून दिल्या. मात्र त्या त्रुटी दूर करण्याऐवजी काँग्रेसचा एक गट थेट उच्च न्यायालयात गेला. मात्र कायदा आपल्या बाजूला नाही हे लक्षात येताच त्यांनी याचिका मागेही घेतली. त्यामुळे आपल्या पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रशासनावर नाहक टीका केल्याबद्दल विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी नाराजी व्यक्त केली.
Vijayalakshmi Bidari : विभागीय आयुक्तांनी सांगितलेले घटनाक्रम
- पहिल्यांदा 23 जानेवारी रोजी 13 नगरसेवक गट नोंदणीसाठी आले.. त्यावर उर्वरित 14 नगरसेवकांनी आक्षेप घेतले..
-त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी 17 नगरसेवक गट नोंदणीसाठी आले.. त्यांच्या संदर्भात आधीच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतले.
-2 फेब्रुवारी रोजी आलेल्या 17 नगरसेवकांमध्ये 23 जानेवारी रोजी आलेल्या 4 नगरसेवकांचा पुन्हा समावेश होता.. म्हणजेच 4 नगरसेवकांनी दोन्ही वेळेला स्वाक्षरी केली होती.
-गट नोंदणीच्या अर्जामध्ये काही त्रुटी होत्या.. त्या त्रुटी दूर करण्यास आम्ही सांगितले होते.. त्रुटी दूर केल्याशिवाय आम्ही गट नोंदणी करू शकणार नाही हे आम्ही लेखी स्वरूपात काँग्रेसला दिले होते.
-मात्र त्रुटी दूर न करता काँग्रेसचा एक गट उच्च न्यायालयात गेला... मात्र त्याच दिवशी याचिका मागे घेतली..
-6 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच काँग्रेसचे सर्व नगरसेवक एकत्रित गट नोंदवायला आले आणि आम्ही गट नोंदणी करून दिली.
-प्रशासनाने कोणाच्याही दबावात न येता पारदर्शकतेने आणि नियमाप्रमाणे काम केले...
























