सोलापूर : आपल्या खळबळजनक वक्तव्याने आणि दाव्याने ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसमधील आमदार उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकट्या सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नगरपालिकेत पैसे वाटण्यासाठी भाजपकडून 300 कोटी रुपये आले आहेत. प्रत्येक नगरपालिकेला किमान 25 कोटी रुपये, अशा पद्धतीने पैसे पक्षाकडून आले असून सर्वात भ्रष्ट असा पक्ष भाजपा (BJP) आहे, असा गंभीर आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. एका बाजूला नगरपालिका निवडणुका या पैसेवाल्यांच्या झाल्याची टीका सर्वच विरोधी पक्षातून होत असताना आज जानकर यांनी थेट भाजपने जिल्ह्यासाठी 300 कोटी रुपये पाठवल्याचा आरोप केला आहे.

Continues below advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असता नेते मंडळींच्या प्रचाराने वेग घेतला आहे. त्यातच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यांसह बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले असून लक्ष्मीदर्शनाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मताला 1000, मताला 2000 असे म्हणत काही ठिकाणी मतदारांचा रेट ठरवला जात असल्याची चर्चा आहे. तर, पक्षाकडून निवडणुकांसाठी पैसेही आल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी चक्क लक्ष्मीदर्शन होणार आहे, बाहेर झोपा असा सल्लाच कार्यकर्त्यांना, मतदारांना दिला होता. तर, आमदार अब्दुल सत्तार यांनीही काजू, किसमिस समजून पैसे घेण्याचा सल्ला दिला. आता, आमदार उत्तम जानकर यांनी गंभीर आरोप केला आहे.   

सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकेत पैसे वाटण्यासाठी भाजपकडून 300 कोटी रुपये आले आहेत. प्रत्येक नगरपालिकेला किमान 25 कोटी रुपये, अशा पद्धतीने पैसे पक्षाकडून आले आहेत. मी 30 वर्षे भारतीय जनता पार्टीत होतो, तेव्हा राष्ट्रप्रथम हे पक्षाचे स्लोगन होते. मात्र, आता भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम हे नवीन स्लोगन या निवडणुकीत आल्याचा टोला उत्तम जानकर यांनी लगावला. पूर्वी अटलजींची जी भाजप होती त्यामध्ये आता भ्रष्ट लोक भरली असून पक्षाची गटारगंगा झाली आहे. पूर्वीची तत्वे काही राहिली नसून केवळ भ्रष्टाचार एवढ्या एकाच मुद्द्यावर हे सर्व एकत्र येत आहेत, असे जानकर यांनी म्हटले. तसेच, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही सडकून टीका करत, जिथे भाजप चौथ्या नंबरवर आहे तिथे कोणाचेही पैसे घ्या आणि मत आम्हाला द्या अशी भाषा पालकमंत्री वापरत असल्याचे जानकर यांनी म्हटले. सध्या राज्यात तीन पक्ष्यांच्या सरकारचे जे चित्र आहे ते फार काळ टिकणारे नाही, यातून लवकरच मोठा स्फोट झालेला दिसेल असा दावाही आमदार जानकर यांनी केला आहे.

Continues below advertisement

हेही वाचा

आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा