मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील सर्व खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या बैठकीनंतर आमदार सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंकडे गेलेले काही माजी नगरसेवक संपर्कात असल्याचं सांगितलं. सचिन अहिर यांना प्रत्यक्ष माजी नगरसेवकांची संख्या विचारली असता त्यांनी आज आकडेवारीबाबत बोलता येणार नाही, असं म्हटलं.
सचिन अहिर (Sachin Ahir) नगरसेवकांच्या घरवापसीबाबत काय म्हणाले?
सचिन अहिर ठाकरे गटाच्या संपर्कात असलेल्या माजी नगरसेवकांबाबत माहिती देताना म्हणाले की पुन्हा येणाऱ्यांमध्ये नगरसेवकांपैकी काही जण आहेत. काही जण इकडून तिकडून कॉन्टॅक्ट करत आहेत. मनसे आणि आमची युती झाली तर जे मराठी भाषिक मतदान आहे. ज्या पद्धतीने मुंबईत नेतृत्व देण्याचं काम शिवसेना पक्षाने दिले आहे त्याचा आता वेगळा परिणाम त्यांना पाहायला मिळतोय. एकनाथ शिंदेंकडे गेलेल्या 46 माजी नगरसेवकांपैकी संख्या विचारली असता सचिन अहिर यांनी पक्ष जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत काही बोलता येणार नाही.आज आकडेनिहाय बोलता येणार नाही पण सुतोवाच काही लोकांनी केले आहे, अशी माहिती दिली.
सचिन अहिर म्हणाले आजच्या बैठकीत काही गोष्टींबाबत चर्चा झाली. त्यातील काही गोष्टींची जाहीर चर्चा करू शकत नाही. महानगरपालिका निवडणूक कशी जिंकता येईल? त्यात काय जबाबदारी प्रत्येकाने घेतले पाहिजे काय परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे.तसेच भौगोलिक परिस्थिती जी बदलत चाललेली आहे, त्याचा काय परिणाम आताच्या उमेदवारांवर होऊ शकतो या संदर्भातील चर्चा करण्यात आली.
यामध्ये एक चांगली बाब अशी आहे की काही लोकांनी सांगितलं की जे गेलेले लोक आहेत ते परत येऊ इच्छित आहेत. जे गेले त्यांच्या जागी नवीन उमेदवार किंवा नवीन प्रतिनिधी तयार करायला आम्ही प्रयत्न करतोय. मात्र, सर्व प्रकारचे साधक बाधक चर्चा झाली. विशेष जबाबदारी आपला मतदारसंघ सोडून आमदार, खासदार यांना देण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली. त्याबद्दल पक्षप्रमुख स्पष्टपणे सांगतील. मात्र, खासदारांची सुद्धा जबाबदारी आहे की शाखा आणि विभागनिहाय बैठका घेतल्या पाहिजेत. चांगले वॉर्ड आहेत, जे विभाग आहेत त्यामध्ये आपल्याला लढायचा आहे त्या विभागात पूर्ण ताकतीने पक्ष संघटना बांधायचे आहे,
नितेश राणेंना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी लागते
नितेश राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते वेगळी भूमिका घ्यायचे. मी त्यांना दोष देणार नाही पण शेवटी ज्या पक्षातून त्यांना मंत्रीपद मिळाले आहे, त्या पक्षाची भूमिका त्यांना मांडावी लागते. पण असं एका समाजाबद्दल टीकात्मक बोलून बोलून द्वेष निर्माण करणं, समाजात कटूता निर्माण करण्याचं काम केलं जात आहे, यावर जास्त प्रतिक्रिया द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही, असं सचिन अहिर म्हणाले.
पुणे पदवीधर संदर्भात आम्ही महाविकास आघाडी म्हणून वरच्या स्तरावर चर्चा करतो आहे. पण, शेवटी इंडिया अलायन्स आणि सर्व मिळून निवडणूक लढायची आहे. ही भूमिका विधानसभा, विधान परिषद आणि राज्यसभेसाठी आहे. पण संधी आम्हाला मिळाली तर आम्ही मतांची आखणी करू शकतो. कारण सिनेट निवडणुकीमध्ये आणि यापूर्वी मुंबईत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात २ जागा शिवसेनेच्या जिंकून आणल्या आहेत.
