Mumbai Municipal Corporation Election मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईत भाजप (BJP) मोठा भाऊ तर शिवसेना (Shivsena Shinde Group) लहान भाऊ असणार, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांची दिली आहे. मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने भाजप अधिक जागांवर ठाम असल्याचं कळतंय. मुंबईसाठी भाजपचा 150 चा नारा असल्याचंही सूत्रांकडून कळतंय. दरम्यान ठाण्यातील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपला थोडं कमी जागांवर थांबावं लागणार असल्याचंही चित्र आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेने निवडणुकीआधी सर्वेक्षण केल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मुंबई भाजपने अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण केलंय. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्यास मुंबईत काय चित्रं असेल याचा आढावा घेण्यात आलाय. दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपच्या जागांवर परिणाम होणार नाही. भाजपने 150 च्या वर जागा लढल्यास भाजपला फायदा होत असल्याचं निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आलंय.
मुंबई महापालिकेत सद्यस्थितीत कोणाकडे किती माजी नगरसेवक?
मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार अपक्ष नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर एकूण संख्या 88 नगरसेवकांची झाली. नंतर शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही संख्या 94 झाली. त्यानंतर जात पडताळणी आणि पोटनिवडणुकीमध्ये 2022 पर्यंत मुदत संपेपर्यंत शिवसेनेचे आणखी पाच नगरसेवक वाढले. शिवसेनेचा नगरसेवकांची संख्या 99 झाली. शिवसेनेमध्ये झालेला पक्ष फुटी नंतर एका मागे एक 2017 साली निवडून आलेले नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला लागले.सद्यस्थितीत एकूण 44 माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे तर 55 माजी नगरसेवक हे आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत.
मुंबईत 2017-2022 दरम्यान शिवसेनेचं बळ-
2017 ला विजय- 84निकालानंतर अपक्ष प्रवेश-4मनसे नगरसेवकांचा प्रवेश- 62022 नंतर आणखी प्रवेश-5मुदत संपताना नगरसेवक संख्या- 97
शिवसेना फुटीनंतरचं वास्तव-
ठाकरेंच्या शिवसेनेत- 55शिंदेंच्या शिवसेनेत- 44
महापालिका निवडणुका कधी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष
राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण पुढील सहा ते सात महिने महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नसल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवरसर्वच पक्षांनी जोरदार तयारीला देखील सुरुवात केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी यावेळी मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटानं देखील पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.
