मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मुंबईमध्ये काल (गुरूवारी, ता ३०) मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून होत असलेल्या कथित मतचोरी बाबत भाष्य केलं आणि घोटाळा कसा होतो? याची प्रात्याक्षिके देखील दाखवली. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने राज्य सरकारकडून शिवरायांच्या गड किल्ल्यांवर नमो टुरिझन सेंटर उभारले जाणार आहेत. त्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कठोर शब्दांत बोलत या निर्णयाला विरोध दर्शवत एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. याबाबचा जीआर आणि वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या देखील त्यांनी यावेळी दाखवल्या.

Continues below advertisement

Raj Thackeray:  उभं केलं की फोडून टाकणार

एकनाथ शिंदे आणि नमो टुरिझन सेंटरबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, आपण आपला स्वाभिमान किती गहाण टाकायचा याला काही मर्यादा? ह्यांच्या मनात हा विचार येतोच कसा? आजच्या इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत. याबाबतचा जीआर सुद्धा आला आहे. हे एकनाथ शिंदे यांचं खातं आहे. काय करत आहेत हे ऐकाल तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल, नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभाग महाराष्ट्रात पर्यटनाचे स्पॉट काढत आहेत. त्या केंद्रांची नावे नमो टुरिझम सेंटर्स देण्यात आली आहेत. हे नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढत आहेत तर शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर... जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे तिथे हे टुरिजम सेंटर काढायला निघाले आहेत. मी आता सांगतोय. सत्ता असो नसो. वर नाही, खाली नाही, आजूबाजूला असो, कुठेही नाही. उभं केलं की फोडून टाकणार", असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

Raj Thackeray: पंतप्रधानांनादेखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू

"मला स्वत:ला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं हे वरती पंतप्रधानांनादेखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे, हे कशातून येत? तर सत्ता डोक्यात गेली की, आम्ही वाट्टेल ते करु, असा विचार येतो. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असो किंवा काहीही असूदेत. मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. मला सत्ता मिळाली पाहिजे. मला जे समोर दिसेल ते मिळायला पाहिजे. यासाठी मला ज्यांना खूश करता येईल त्यांना खूश करावं लागेल. मुंबईतील जागा अदाणीला पाहिजेत? देऊन टाका. तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत. हे सगळं सत्तेतून. सत्ता येते ईव्हीएममधून", असं म्हणत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

Continues below advertisement