हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...
आपल्या वाट्याला गेले तर मी सोडत नसतो, शिंदे असो फडणीस असो, दादा असो असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला.

जालना: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती दिली. तसेच, शिंदे समिती पुन्हा एकदा अंतरवालीत दौरा करणार असून चर्चा करण्यात येईल, असेही सांगितले. दरम्यान, यावेळी, राधाकृष्ण विखे पाटलांनी नाव न घेता थेट शरद पवारांकडे (Sharad Pawar) बोट दाखवलं. 1994 साली मंडल आयोगात हे टाकलं असतं तर आज ही वेळ आली नसती, हे सगळं त्यांचं पाप आहे, असेही विखे पाटलांनी म्हटले. त्यावर, आता जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे.
शासनच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनीही आपली भूमिका मांडली. आपल्या वाट्याला गेले तर मी सोडत नसतो, शिंदे असो फडणीस असो, दादा असो असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. तसेच, विखे पाटील आणि सावंत डोक्यावर पडले आहेत का? गोळ्या सुरू आहेत का त्यांना? चांगला रिस्पॉन्स कसा असतो नरड्यात हात घालायचा का तुमच्या? आम्ही तुम्हाला येऊ नका म्हणलो का? असे म्हणत सरकारच्यावतीने जी बोलणी सुरू आहेत, त्यावरही जरांगे पाटलांनी भाष्य केलं. तुम्हाला यायचं असेल तर सगळे जीआर काढून या, असेही पाटलांनी म्हटले.
तुम्हाला तेच भांडण लावायचंय
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नाव न घेत शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील उल्लेख करण्यात आला होता. तसेच, 1994 सालच्या मुख्यमंत्र्यांचं हे पाप आहे,असेही विखे पाटलांनी म्हटले होते, त्यावरूनही जरांगे पाटलांनी सुनावलं. तुम्हाला तेच भांडण लावायचं आहे शरद पवार होते आणि कोणी होतं. त्यांनी वाटोळ केलं आमचं, तुम्ही काय कमी केलं का? असा सवाल जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारला. तसेच, आता तू शिफारस कर, तू मराठ्याचा देव, लोकाकडे कशाला बोट दाखवतो. आता, 12 तारखेपर्यंत वाट बघणार आहे, असे म्हणत विखे पाटलांवरही जोरदार हल्लाबोल केला.
विखे पाटील नेमकं काय म्हणाले
येत्या 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या सात दिवसांच्या कालावधीत राज्यात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबवण्यात येणार आहे. या काळात कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात ज्यांनी अर्ज केला आहे, त्याबाबत कार्यवाही करु असे मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil ) म्हणाले. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांना ( Sharad Pawar) टोला लगावला. 1994 ला मंडल आयोगात मराठा समाजाचा अंतर्भाव केला असता तर हा इतिहास घडला नसता. 1994 साली जे मुख्यमंत्री होते हे त्याचं पाप आहे असा टोला विखे पाटील यांनी पवारांना लगावला. मात्र आम्ही आता प्रयत्न करतोय असे विखे पाटील म्हणाले.
हेही वाचा
हे पाप शरद पवारांचे, 1994 ला निर्णय घेतला असता तर... मराठा आरक्षणावरुन विखे पाटलांचा पवारांना टोला
Before You Go
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक





















