Manoj Jarange Patil: राज्य सरकारने एखाद्या समाजावर अन्याय होईल, असे वागू नये. मुंबईतील आझाद मैदानातून मराठा आंदोलकांना हुसकावून लावलं तर ती सल खोलवर काळजात रुतणारी असेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही काहीतरी निमित्त काढून मराठ्यांना आझाद मैदानावरुन हुसकावून लावू नका. तुम्ही पोलिसांना (Mumbai Police) सांगून आम्हाला अटक करायला लावली तर ते घातक असेल. आमच्या मराठा आंदोलकांवर लाठीमार केला तर ते अतिघातक ठरेल. तुम्ही गरीब मराठ्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला दिला.
सरकारने आम्हाला कितीही भीती घातली तरी आम्ही भिणार नाही. आम्ही मराठ्यांची औलाद आहोत. आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या, देवेंद्र फडणवीस. मी जे जे बोलतो, ते ते होत असतं. आणखी मराठे मुंबईत यायला सुरुवात झाली नाही. शनिवारी आणि रविवारी मराठे मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असेल. ती वेळ येऊन देऊ नका. तुम्ही जास्तीत जास्त काय कराल? 100 पोलीस आले तरी अटक करणार आहेत, 1 लाख पोलीस आले तरी अटक करुन जेललाच नेतील. आम्ही जेलमध्येही उपोषण करु. पण आता सरकाला सुट्टी नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
सरकार गोरगरिबांना विसरलं तर न्यायालय त्यांना आधार देते. आम्हाला न्यायदेवता 100 टक्के न्याय देईल. आम्ही लोकशाहीच्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेले नाही. आम्ही शांततेत उपोषण करत आहोत. न्यायालयाचा आदेश आल्यानंतर आम्ही काल रात्री सगळ्या गाड्या काढल्या. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. यापेक्षा कायद्याचं काय पालन करायचं, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.
Manoj Jarange Patil: तुम्ही ज्याच्या जिवावर बोलताय त्यांच्यापेक्षा आमची संख्या साडेनऊ पट जास्त आहे: मनोज जरांगे पाटील
राज्य सरकारने नको त्या विषयात घुसू नये. आम्हाला आझाद मैदानातून हाकलवून देण्याच्या वल्गना बंद करा. मी मेलो तरी आझाद मैदानातून हटत नाही. सरकार कुठल्याही थराला गेले तरी मी त्या थराला जाईन. मराठा काय असतात, हे 350 वर्षांनी पुन्हा बघायचं असेल तर माझा नाईलाज आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा