Malegaon News: मालेगावच्या राजकारण्यांना शिवजयंतीचा विसर, शहराच्या प्रवेशद्वारावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष, भाजप आक्रमक
Malegaon News: शिवरायांच्या पुतळ्याची रंगरंगोटी, सजावट, प्रकाशयोजना आणि स्वच्छता न केल्यामुळे शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले आहे.

Malegaon News: मालेगावमध्ये टिपू सुलतान फोटो प्रकरणाचा वाद सुरू असतानाच नवीन वादंग उभा राहण्याची शक्यता आहे. मालेगावमध्ये (Malegaon) आज शिवजयंतीच्या (Chhatrapati Shivaji maharaj Jayanti) निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर पुतळ्याची स्वच्छता, सुशोभीकरण आणि पुष्पहार अर्पण न केल्याने शहरात लाट उसळली आहे. मनपा प्रशासनाच्या (Malegaon Municipal Corporation) भूमिकेविरोधात शहरात निषेधाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. शिवरायांच्या पुतळ्याची रंगरंगोटी, सजावट, प्रकाशयोजना आणि स्वच्छता न केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त असून प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आलाय. यामुळे मालेगावात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसून येत आहेत.
Malegaon News: टिपू सुलतानचा उदो उदो करणाऱ्या मालेगावात शिवरायांचा विसर
याबाबत भाजपचे शहरप्रमुख देवा पाटील एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, मालेगाव शहरात मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे. तसेच प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आहे. परंतु जाणून-बुजून महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. सालाबादाप्रमाणे त्या ठिकाणी स्वच्छता, सुशोभीकरण आणि रोषणाई होणे अपेक्षित होते. परंतु टिपू सुलतानचा उदो उदो करणारी ही व्यवस्था आहे. उपमहापौर आणि त्यांच्या काही नगरसेवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडतो. आम्ही याचा निषेध व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Malegaon News: सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न?
देवा पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शांतता नांदत आहे, त्यात ठिणगी टाकण्याचे काम मालेगावमधून उपमहापौर करत नाही ना? एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. मात्र, मालेगावमध्ये प्रवेशद्वारावर दुर्लक्ष करून सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नाची सुरुवात मालेगावातून सुरुवात होत आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























