Pradhan Mantri Ujjwala Yojana LPG Gas subsidy: रालोआ सरकारची लोकप्रियता अनेकपटींनी वाढवणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या गेमचेंजर ठरलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत केंद्र सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, उज्ज्वला योजनेतील (PM Ujjwala Scheme) सवलतीच्या सिलेंडरला (Gas subsidy) आता कात्री लावण्यात आली आहे. परिणामी उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी 9 ऐवजी आता फक्त 4 सिलेंडरसाठीच 300 रुपये अनुदान मिळेल. सध्याच्या घडीला देशभरात उज्ज्वला योजनेचे 10 कोटी 55 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. 2016 साली पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरु करण्यात आली होती. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी गॅसची किंमत वाढली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांना सध्या प्रति सिलेंडर (Gas Cylinder) 700 रुपये तोटा होत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने अनुदानिक गॅस सिलेंडरची संख्या घटवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 942 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे आता उज्ज्वला योजनेतीला लाभार्थ्यांना 4 अनुदानित गॅस सिलेंडर संपल्यानंतर 942 रुपये मोजून एलपीजी गॅस विकत घ्यावा लागणार आहे.
युद्धामुळे आतापर्यंत एलपीजी 46 टक्क्यांनी महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 642 रुपयांना अनुदानित गॅस सिलेंडर मिळत होता. त्यासाठी प्रत्येक अनुदानित सिलेंडरमागे केंद्र सरकार 300 रुपये अनुदान देत होते. आता उज्ज्वला योजनेअंतर्गत 642 मध्ये आता वर्षाला 4 सिलेंडरच मिळतील. चारपेक्षा जास्त गॅस सिलेंडर लागल्यास त्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील कुटुंबाना बसण्याची शक्यता आहे. उज्ज्वला योजना सुरु करण्यात आली तेव्हा हा केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणला गेला होता. या योजनेची प्रचंड जाहिरात आणि गाजावाजा झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना एलपीजी गॅस वापरण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी पारंपरिक पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करण्याचे सोडून एलपीजी गॅसचा वापर सुरु केला होता. मात्र, आता अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या 9 वरुन अवघी 4 इतकी करण्यात आल्याने वर्षभर स्वयंपाकापासून इतर गोष्टी कशा करायच्या, असा प्रश्न या कुटुंबाना पडण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
