Karuna Munde: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राज्य निवडणूक आयोगानं मराठवाड्यातील 48 नगरपरिषद आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा केलीय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग येत असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात सातत्याने टिकेची झोड उठवणाऱ्या करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी परभणीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. "ते दोघे नाही तर मी गोपीनाथ मुंडे यांची खरी वारस आहे, त्यांच्या विचारांवरच मी चालतेय" असं म्हणत करुणा मुंडेंनी अर्थमंत्री अजित पवार व महायुतीवरही कडवी टीका केलीय. (Parbhani)

Continues below advertisement

काय म्हणाल्या करुणा मुंडे? 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष तयारी करत असताना आता करुणा मुंडे त्यांच्या स्वराज्य शक्ती सेनेला घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.  त्या मराठवाड्याबरोबरच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या निवडणुका स्वबळावर लढणार आहेत असं त्यांनी आज परभणीत पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

करुणा मुंडे म्हणाल्या, महाराष्ट्रात सध्या असलेल्या आठही पक्षांनी महाराष्ट्राला सत्तर वर्ष मागे नेले आहे. तुम्ही आमची झाका आणि आम्ही तुमची झाकतो हेच धोरण हे पक्ष राबवत आहेत. त्यामुळे आम्ही शेतकरी विद्यार्थी कष्टकरी महिला या सर्वांचे प्रश्न घेऊन राज्यातल्या सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा करूना मुंडे यांनी परभणीत केली आहे .तसेच अजित पवारांवर 70 हजार कोटींचे आरोप असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अर्थमंत्री केले. भाजपचे नेते अशाच पद्धतीने भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेत आहेत.  गोपीनाथ मुंडे यांची खरी वारसदार मी आहे, हे दोघेही त्यांचे वारस नाहीत. गोपीनाथ मुंडेंनी सामान्यांच्या न्याय हक्कांची लढाई लढली. हीच लढाई मी लढत आहे. त्यामुळे त्यांची वारसदार मी असल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.

Continues below advertisement

अजित पवारांवर कडवी टीका 

परळी मतदारसंघाविषयी बोलतानाही त्या म्हणाल्या, संपूर्ण महाराष्ट्रात सारखेच परिस्थिती आहे. पदावर गेल्यानंतर गोरगरिबांची जमीन हिसकावून घेतात. महिलांवर अत्याचार, पिक विम्याचे पैसे खातात. शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे खातात. अजितदादा जे अर्थमंत्री होऊन बसले आहेत, त्यांनी 75 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. अर्थमंत्री तरीही त्यांना अर्थमंत्री म्हणून बसवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. चोराच्या हातात तिजोरीची चावी दिली. सगळ्या गोष्टींचा मला राग आहे. मंत्री झाल्यानंतर जर कोणी तोंड उघडलं तर तो कार्यकर्ता जेलमध्ये जातो. यांनी आई-वडिलांनाही सोडलं नाही. या सगळ्याचा राग आलाय. महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी 'स्वराज्य शक्ती सेना' पक्ष काम करत आहे असं करुणा मुंडे म्हणाल्या.

ना भाऊ ना बहिणी फक्त करुणा वहिनी

त्या पुढे म्हणाल्या, "संपदा मुंडे, महादेव मुंडे, करुणा मुंडे, संतोष देशमुख असे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये आहे. धनंजय मुंडे, खासदार , आमदारांची कुंडली काढा ती अशीच निघणार.  यासाठी मला आज पक्ष काढायची गरज पडली. नाहीतर मी कशाला माझ्या दोन मुलांना सोडून गावगाव गेले असते. मुंडे घराण्याची सून आहे मी.. या लोकांना लाज वाटली पाहिजे घरातल्या सुनेला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. महाराष्ट्राला काय न्याय देणार.. राजकारणात वारसा हा विचारांचा असतो. जो मी घेऊन चालले आहे. गोपीनाथ मुंडेंचा वारसा  ना धनंजय मुंडेंचा आहे ना पंकजा मुंडेंचा. यासाठी ना भाऊ ना बहिणी फक्त करुणा वहिनी..." असं करुणा मुंडे म्हणाल्या.