Jayant Patil and CM Devendra Fadnavis in Same Flight: अत्यंत वादग्रत ठरत चाललेलं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा लोकसभेमध्ये मांडण्यासाठी  एनडीएकडून देशव्यापी फोडाफोडीचं सत्र सुरू असतानाच राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षांचे खासदार सुद्धा एनडीएला साथ देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. ही चर्चा रंगली असतानाच त्यांच्याच पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये उद्या (10 ऑगस्ट) भेट घेणार आहेत. या भेटींवरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू असतानाच, आज (9 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केल्याने राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्यांच्या समवेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा होते. 

Continues below advertisement

केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदाची चर्चा 

आता या एकत्रित प्रवासाचा पुन्हा एकदा राजकीय योगायोग आहे का? असा सुद्धा प्रश्न राजकीय वर्तुळामधून चर्चेला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या मिलनाचे तसेच केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदाची चर्चा रंगली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून ह्या चर्चा फेटाळून लावण्यात आल्या असल्या, तरी घडणाऱ्या घडामोडी अनेक शक्यतांना वाट करून निर्माण देत आहेत. जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली होती. मात्र अभिजित दिपके यांच्या भेटीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये या भेटीची चांगली चर्चा रंगली होती. जरी राज्यातील विविध प्रश्नांवर भेट घेतली असली असं सांगितलं जात असलं तरी, ज्या पद्धतीने शरद पवार यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झाली होती त्यावरून बरीच चर्चा रंगली होती.

जयंत पाटील यांच्या अर्थमंत्रिपदाची सुद्धा चर्चा 

आता यानंतर आता शरद पवार पक्षाचे खासदार सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी जाणार असल्याने एक प्रकारे हे कोणते राजकीय संकेत तर नाहीत ना? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणामध्ये जयंत पाटील यांच्या अर्थमंत्रिपदाची सुद्धा चर्चा रंगली आहे. इतकेच नव्हे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित केल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीकडील अर्थमंत्रिपद दिलं जाईल असंही बोललं जात आहे.

Continues below advertisement

नरेंद्र मोदींची भेट कशासाठी घेणार?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट कशासाठी होणार आहे यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी एफसीआरए (FCRA) विधेयकाला विरोध राहणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यांनी मतदारसंघ फेररचना विधेयक आलेलं नाही असं म्हणत सूचक वक्तव्य सुद्धा केलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पीएम मोदींना का भेटणार आहेत? यासंदर्भात त्यांनी बोलताना सांगितलं की, एक-दोन खासदारांची भूमिका होती की महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न आहेत, संसद चालत नाही, त्यामुळे माननीय पंतप्रधानांना महाराष्ट्रात परिस्थिती आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, शहरीकरणामधले मोठे प्रश्न आहेत, सगळ्या खासदारांना पाच कोटी रुपयांचा विकास निधी मिळतो त्याच्या अंमलबजावणीला आव्हाने येतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित मदत खासदारांना मिळत नाही. हे जे विकासाचे रखडलेले प्रश्न आहेत त्यासंदर्भात आपण भूमिका मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं. त्यानुसार उद्याच पंतप्रधान कार्यालयातून भेट देण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या