Continues below advertisement

नागपूर : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांच्याविरुद्ध भाजप आमदार विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवणार असून त्यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याचे समोर आले. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिल्यानंतर, तुकाराम मुंडे प्रकरणी लक्षवेधी मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणारे भाजप (BJP) आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे दोन कॉल आल्यानंतर कृष्णा खोपडे यांनी नागपूर पोलिसांकडे (Police) त्याची तक्रार केली आहे. या तक्रारीत फोनवरुन धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि नावही त्यांनी लिहून दिलं आहे. तुम्ही तुकाराम मुंढेंविरुद्ध का बोलत आहात, त्यांच्या निलंबनाची मागणी तुम्ही का करत आहात? असे प्रश्न विचारत संबंधित फोनवरील व्यक्तीने आमदार खोपडे यांना धमकी दिली होती.

मुख्यमंत्री कार्यालय, विधानसभा अध्यक्ष कार्यालय याशिवाय कृष्णा खोपडे यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच स्थानिक सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये धमकीच्या कॉलसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर मला पाहून घेण्याची धमकी आणि शिवीगाळ करणारे फोन कॉल येत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. ज्या दोन फोन क्रमांकावरून धमकीचे कॉल आले, ते दोन्ही नंबर पोलिसांना देत कृष्णा खोपडे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार हिवाळी अधिवेशनात तुकाराम मुंडे यांच्या विरोधात लक्षवेधी मांडून नागपूरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटीचा कार्यभार बळकावून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आणि महिला अधिकाऱ्यांशी दुर्व्यवहार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी करणार आहे, अशी बातमी एबीपी माझाने दाखविली होती. त्यानंतर, आपणास दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास फोनवरुन धमकी आल्याचं आमदार खोपडे यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वात पार्थ पवार प्रकरणाची चौकशी करावी

दरम्यान, तुकाराम मुंढेंच्या संदर्भातील तक्रारीवरुन काँग्रेस नेते आक्रमक झाले असून आमदार नाना पटोले यांनी थेट पार्थ पवार यांच्या प्रकरणाशी तुलना करत मुख्यमंत्र्‍यांना प्रश्न विचारले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित करावी, असं आव्हान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिलं आहे. तसेच, पार्थ पवार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. या पद्धतीच्या चौकशीचा आणि कमिटीचा फार्स करून जनतेची जी दिशाभूल चाललेली आहे. महाराष्ट्र रोज लुटण्याचं काम सुरू आहे. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल आणि 'दूध का दूध पाणी का पाणी' करायचं असेल तर, तुकाराम मुंढेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा."

हेही वाचा

किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं