Eknath Shinde and Raj Thackeray: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी राज ठाकरे यांच्या मनसेच्या नगरसेवकांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकत्रच गट नोंदणीसाठी आले होते. त्यावेळी मनसेचे माजी आमदार राजू पाटील, श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यात चर्चा होऊन मनसेने (MNS) शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC Election 2026) एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिंदे गटाचे 53 आणि भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत कोणाचा महापौर बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली असतानाच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसेला सोबत घेऊन डाव साधला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केडीएमसीत मनसेचा पाठिंबा का घेतला, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (KDMC Election 2026)

Continues below advertisement

कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेची युती आहे. आम्ही युतीत निवडणुका लढलो. तेथे मनसेने विकासाच्या मुद्द्यांवर आम्हाला पाठिंबा दिला. आम्ही मनसेचं स्वागत करतो. मनसे उमेदवारांच्या वॉर्डमधील समस्या आम्ही नक्की सोडवू. मनसेचा जो विकासाचा अजेंडा आहे, तो आम्ही पूर्ण करु, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या लवचिक राजकीय धोरणाचेही समर्थन केले. मी राज ठाकरे यांचे ट्विट पाहिले. मी वैयक्तिक स्वार्थासाठी निर्णय घेणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी कधीही स्वार्थ पाहिला नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळीही त्यांनी अशीच भूमिका घेत महायुतीला पाठिंबा दिला होता. राज ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करतात, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

तत्पूर्वी भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. जे कोणी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जातो असं सांगतात,  वारसदार आहे म्हणून सांगतात त्यांना मी विनंती करतो, हे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे. इथेच तुमची बाळासाहेबांवर खरी श्रद्धा आहे का? बाळासाहेबांसमोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का? तुम्ही बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता का? जर श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता तर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले होते. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांच्या आम्ही विरोधात आहोत. त्यासाठीच आम्ही त्यांच्याविरोधात जाऊन 2022 मध्ये सरकार बनवले. भाजप आणि शिवसेनेची युती ही बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासूनची आहे, असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

Continues below advertisement

आणखी वाचा

मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सगळं सांगून टाकलं!